नागपूर : आर्थिक सर्वेक्षण अहवाल म्हंटला की देशाच्या अर्थव्यवस्थेबाबतचा लेखाजोखा डोळ्यापुढे येतो. पण यात आर्थविषयक बाबींसोबतच अर्थकारणाशी निगडीत मानवी जीवनातील अन्य बाबींनाही स्पर्श केला जातो. तरुणांचे मानसिक आरोग्य हा कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचा मुद्दा. मानसिक आरोग्यामध्ये आपल्या सर्व मानसिक-भावनिक, सामाजिक, संज्ञानात्मक आणि शारीरिक क्षमतांचा समावेश होतो. केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण २०२४-२५ अहवालात मानसिक आरोग्याबाबत निरीक्षण मांडले आहे.
आर्थिक सर्वेक्षणात असे अधोरेखित केले आहे की, जीवनशैली निवडी, कामाच्या ठिकाणाची संस्कृती आणि कौटुंबिक परिस्थिती उत्पादकतेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि जर भारताच्या आर्थिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करायच्या असतील, तर बालपण, तारुण्यातील जीवनशैलीकडे त्वरित लक्ष दिले पाहिजे.आर्थिक सर्वेक्षणात असे अधोरेखित केले आहे की, लहानमुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ ही इंटरनेटच्या आणि विशेषतः सोशल मीडियाच्या अतिवापराशी संबंधित आहे.
कामाच्या ठिकाणी उत्तम व्यवस्था असावी
कामाच्या ठिकाणी चांगल्या संस्कृतीमुळे मानसिक आरोग्य चांगले राहते असे आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे. त्यात असेही म्हटले आहे की जीवनशैलीतील निवडी आणि कौटुंबिक परिस्थिती देखील मानसिक आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
जंकफूड धोकादायक
जे लोक क्वचितच पॅकेज्ड जंक फूड खातात त्यांचे मानसिक आरोग्य नियमितपणे ते सेवन करणाऱ्यांपेक्षा चांगले असते, असे आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे. जे लोक क्वचितच व्यायाम करतात, सोशल मीडियावर आपला मोकळा वेळ घालवतात किंवा त्यांच्या कुटुंबाच्या जवळ नसतात त्यांचे मानसिक आरोग्य खराब असते आणि स्वतःच्या डेस्कवर जास्त वेळ घालवणे हे मानसिक आरोग्यासाठी तितकेच हानिकारक आहे, असे म्हटले आहे
अर्थव्यवस्थेवर परिणाम
मानसिक आरोग्य आणि जीवनशैली सर्वेक्षणात असे अधोरेखित केले आहे की, योग्य मानसिक आरोग्याचे कमी प्रमाण चिंताजनक आहे, तसेच या ट्रेंडचे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणामही तितकेच त्रासदायक आहेत. प्रतिकूल कार्य संस्कृती आणि डेस्कवर जास्त वेळ काम करणे यामुळे मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो आणि शेवटी आर्थिक वाढीच्या गतीला ब्रेक लागू शकतो .
आरोग्यदायी मनोरंजनाची गरज
आर्थिक सर्वेक्षणात शालेय आणि कुटुंब पातळीवर आरोग्यदायी मनोरंजनाला प्रोत्साहन देण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे, जेणेकरून मित्रांसोबत भेटणे, बाहेर खेळणे, जवळचे कौटुंबिक संबंध निर्माण करण्यासाठी वेळ घालवणे यामुळे मुले आणि किशोरवयीन मुले इंटरनेटपासून दूर राहतील आणि मानसिक आरोग्य सुधारेल. आपल्या मुळांकडे परतल्याने मानसिक आरोग्याच्या बाबतीत आपण आणखी उंच भरारी घेऊ शकतो असे आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे.