चंद्रशेखर बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : भारतीय विज्ञान परिषदेसाठी (इंडियन सायन्स काँग्रेस) देश-विदेशातून आलेल्या प्रतिनिधींना नागपूर व विदर्भातील प्रमुख स्थळांची माहिती व्हावी, त्यांनी तेथे भेटी द्याव्यात यासाठी आयोजकांनी जी स्थळे निवडली आहेत, त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, हेडगेवार स्मृती मंदिरासह अनेक मंदिरे, पर्यटन स्थळांचा समावेश आहे. मात्र, कधीकाळी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र राहिलेले महात्मा गांधी यांचे सेवाग्राम व भूदान चळवळीच्या माध्यमातून भूमिहीनांना भूस्वामी करण्याचा प्रयोग भारतात यशस्वी करणारे आचार्य विनोबा भावे यांच्या पवनार या दोन स्थळांचा समावेश नाही. विशेष म्हणजे, ही दोन्ही स्थळे नागपूरपासून १०० किलोमीटर अंतरावर महामार्गालगत आहेत. याउलट अजिंठा-वेरूळ व गडचिरोलीतील मरकडा या शेकडो किलोमीटर दूरच्या स्थळांचा यादीत समावेश आहे.

१०८ वी भारतीय विज्ञान परिषद सध्या नागपुरात सुरू आहे. चार दिवस चालणाऱ्या या परिषदेत विविध वैज्ञानिक व सामाजिक विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. विविध ठिकाणांहून नागपुरात आलेल्या प्रतिनिधींना नागपूर, विदर्भातील पौराणिक, ऐतिहासिक स्थळांसह नैसर्गिक सौंदर्याची माहिती मिळावी म्हणून त्यांनी कुठल्या स्थळांना भेटी द्याव्यात यासाठी आयोजकांनी प्रमुख स्थळांची निवड केली आहे.

असोसिएशनच्या संकेतस्थळावर आणि माहिती पत्रिकेत याची माहिती देण्यात आली आहे. या स्थळांना भेटी देणे हे ऐच्छिक आहे. त्यासाठी एक दिवसापासून सहा दिवसांपर्यंत सहल नियोजन तयार करण्यात आले असून ते सशुल्क आहेत. भेटीसाठी जी स्थळे निवडली आहेत त्यात स्थानिक पातळीवरील शहरांमध्ये संघ मुख्यालय, हेडगेवार स्मृती मंदिर, दीक्षाभूमी, ड्रॅगन टेम्पल, रामटेकमधील गडमंदिर, स्वामी नारायण मंदिर, मनसर, कालिदास स्मारक, रामन विज्ञान केंद्र या स्थळांसह जंगल सफारीसाठी पेंच, उमरेड कऱ्हांडला, नवेगाव खैरी, चिखलदरा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे मोझरी, लोणार, मरकडा, मराठवाडय़ातील अजिंठा, वेरूळ आदी स्थळांचा समावेश आहे.

या प्रमुख स्थळांच्या यादीत महात्मा गांधी यांच्या सेवाग्रामचा आणि आचार्य विनोबा भावे यांच्या पवनार या दोन प्रमुख स्थळांचा समावेश नाही, याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

परदेशी पर्यटक, अभ्यासकांची मात्र पसंती..
पूर्वी परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना जी देशाविषयी माहिती दिली जात होती त्यात सेवाग्राम व पवनारचा उल्लेख असायचा. आजही सेवाग्राम व पवनारला भेट देणाऱ्यांमध्ये परदेशी पर्यटक, अभ्यासक जास्त असतात. महात्मा गांधी यांच्या विचारांविषयी आस्था असणाऱ्यांची संख्या परदेशात अधिक आहे. ते भारत भेटीवर आल्यावर आवर्जून या दोन्ही स्थळांना भेटी देतात. पूर्वी देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्याचे मुख्यमंत्री आवर्जून सेवाग्रामला येत असत. आता ते प्रमाण कमी झाले.