नागपूर : राहुल गांधींसारखे लोक विरोधी पक्षनेतेपदी असणे हा देशासाठी शाप आहे, अशी कठोर टीका संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी केली. ते शुक्रवारी नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. रिजिजू म्हणाले, संविधान वाचलेले नाही किंवा ज्यांना त्याचा आत्मा समजलेला नाही, अशा व्यक्तीने संविधान हा शब्द उच्चारणेही संविधानाचा अपमान आहे. त्यांच्यासारख्या व्यक्तीने संविधानाला हात लावणे अयोग्य आहे. अशी व्यक्ती देशाच्या विरोधी पक्षनेतेपदी आहे, हे आमचे दुर्दैव आहे. ज्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला, त्यांच्या तोंडी संविधान शब्द शोभत नाही, असेही रिजिजू म्हणाले.

हेही वाचा >>> ३५ निर्णय, १७१ शासकीय आदेश! मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा पुन्हा धडाका

वक्फच्या जमिनी बळकावल्या

वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाबाबत रिजिजू म्हणाले, सर्व जमीन देशाची आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनी काहींनी बळकावल्या आहेत. त्या जमिनीचा दुरुपयोग झाला आहे. या माध्यमातून काही लोक कोट्यधीश झाले आणि बहुसंख्य मुस्लिमांना गरीब ठेवण्यात आले. यामुळे हे दुरुस्ती विधयेक आणण्यात आले आहे. काँग्रेसने केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाला मुस्लीम मंत्रालय केले होते.