नागपूर : भारतीय औषध उद्योगाला जगभरात चांगलीच ख्याती प्राप्त झाली आहे. त्यामुळे स्वस्त आणि दर्जात्मक उत्पादने तयार करण्यासाठी आपल्याला संशोधन आणि नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. हे झाले तर आपल्या औषध उद्योगांमध्ये असलेल्या निर्यातीच्या अफाट क्षमतांचा विस्तार होईल आणि अर्थव्यवस्थेचा ‘५ ट्रिलीयन डॉलर’चा टप्पा गाठणे शक्य होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात आज शुक्रवारपासून सुरू झालेल्या ७२ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाचे प्रमुख डॉ. वेणुगोपाल सोमाणी, केमिस्ट अँड ड्रगिस्टचे अध्यक्ष जगन्नाथ एस. शिंदे, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. टी. व्ही. नारायण, डॉ. प्रमोद खेडेकर उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले, औषध उद्योगात रोजगार निर्मितीसोबतच सामाजिक, आर्थिक परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता आहे. विविध क्षेत्रातील अधिकाधिक लोकांना औषध क्षेत्राशी जोडण्यासाठी अधिकाधिक कृषी आधारित उत्पादनांचा वापर करण्याची गरज आहे. उद्योगांच्या सोयीसाठी आणि वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी देशात उपलब्ध होत असलेल्या प्रगत दळणवळण सुविधांचा वापर करण्यावरही गडकरी यांनी भर दिला.
हेही वाचा >>> नवेगावबांध धरणाच्या कुशीत रंगीबेरंगी फुलपाखरांचे विश्व, ७० प्रजातींच्या माहितीची नोंद
डॉ. वेणुगोपाल सोमाणी म्हणाले, भारतीय उत्पादने जगातील सर्वाधिक परवडणारी आणि दर्जेदार उत्पादने आहेत. जेनेरिक औषधांबरोबरच नावीन्य ही काळाची गरज आहे. यामुळे उत्पादन खर्च कमी करून औषधे सर्वांना परवडणारी बनवण्याच्या संधी शोधता येतील. संशोधन आणि विकासाचा वेगवान दृष्टिकोन, स्वावलंबनासाठी स्थानिक बाजारपेठेचे बळकटीकरण, चांगल्या प्रवेशासाठी स्पर्धात्मक इको-सिस्टीम इत्यादींबद्दलही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, ७२ व्या ‘आयपीसी’वरील स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, गडकरींच्या हस्ते प्रख्यात फार्मासिस्ट मंडळींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. आयोजन समितीच्या सदस्यांचा सत्कारही करण्यात आला.