बुलढाणा : मागील सात जुलैला खामगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेत जमीन आणि पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्रिपुरा राज्याच्या दौऱ्यावरून परतलेल्या केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज या नुकसानीची पाहणी केली. या प्रचंड नुकसानी मुळे स्वतः शेतकरी असलेले नामदार जाधव हे देखील व्यथित झाल्याचे दिसून आले.बाधित एकही शेतकरी मदतीपासून वंचित रहायला नको अशी तंबीच त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सोमवारी (दिनांक १५) खामगाव तालुक्यातील कोलोरी, पिंपरी गवळी येथे भेट देऊन पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, तहसीलदार अतुल पाटोळे आदी सहभागी झाले . अतिवृष्टीमुळे काही तासांतच खरीप पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. शेकडो हेक्टर शेत जमीन अजूनही पाण्याखाली आहे. यामुळे दोनशे बेचाळीस परिवार बाधित झाले.तसेच ८३८ हेक्टर सुपीक शेतजमीन अक्षरशः खरडून गेली आहे. एकट्या पिंप्री गवळी गावातील दोनशे हेक्टर जमीन तर कोलोरी गावातील शंभर हेक्टर शेत जमीन खरडून गेली.

हेही वाचा…गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यात मुसळधार पाऊस; विज पडून म्हैस ठार

नदी काठावरच्या अनेक विहिरी खचून गेल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ‘पंचनाम्याचे स्थायी आदेश’ दरम्यान पाहणी केल्यावर नामदार जाधव यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेत पिकाच्या पंचनाम्यासाठी शासनाकडून स्थायी आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही आदेशाची गरज नाही. तलाठी आणि मंडळ अधिकारी स्वतः नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे करून शासनाकडे सादर करू शकतात, असे मंत्र्यांनी ठणकावून सांगितले.

खामगाव तालुक्यातील ११ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टी झाली नसलेल्या पारखेड मंडळातील ज्या भागात जास्त पाऊस झालेला आहे, तेथीलही पंचनामे करण्यात यावे. स्थानिक पातळीवर पंचनामे करताना शेतजमीन खरडून जाणे , शेतामध्ये पाणी साचणे, पिकांचे नुकसान याचे वेगवेगळे पंचनामे करण्यात यावे. तालुक्यात ८३८ हेक्टर जमीन खरडून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना सूचना देऊन केलेल्या पंचनाम्याचे अहवाल ग्रामपंचायतीमध्ये सादर करावे. हे अहवाल चावडीवाचन करून नागरिकांना सांगावे, अशी सूचना त्यांनी दिली शासकीय यंत्रणेने केलेल्या पंचनाम्यावरच नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानाची मदत मिळत असल्याने खरीप पिक आणि फळबागा यांचे व्यवस्थित पंचनामे करावे. सुमारे २४२ कुटुंबे पुराच्या पावसामुळे बाधित झाले आहे. त्यामुळे त्यांचाही अहवाल शासनाकडे सादर करावा.

हेही वाचा…वर्धेतील ‘या’ डॉक्टर जोडप्याचे ‘बंटी-बबली’ला लाजवेल असे कृत्य! कोट्यवधी रुपयांची…

इतर भागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा’

गतीने पंचनामे होण्यासाठी इतर भागातील तलाठी आणि मंडळ अधिकारी याची पंचनाम्याकरिता नियुक्ती करण्यात यावी. नुकसान झालेल्या घरांसाठी दहा हजार रुपयाची मदत मिळत असल्याने यासाठीही शासकीय यंत्रणेने व्यवस्थितरित्या पंचनामे करावेत.तालुक्यात पर्जन्यमान मापन यंत्रे सुव्यवस्थेत असल्याची खात्री करावी. पर्जन्यमानाच्या आकडेवारीवर नुकसान भरपाई मिळते. खरडून गेलेल्या जमिनीचे तातडीने पंचनामे करण्यात यावे. स्थानिक नागरिकांनी पंचनाम्यासाठी सहकार्य करावे. नुकसान झालेल्या एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देशही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले. या पाहणी दौऱ्यात शिवसेना ( शिंदे गट) , भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित दादा गट) चे पदाधिकारी कार्यकर्तेही सहभागी झाले. त्यांच्या सोबतही चर्चा करून मंत्र्यांनी नुकसानीची माहिती जाणून घेतली.