बुलढाणा : जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने १ हजार ८६ हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिके व फळबागांना तडाखा बसला आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक पाहणीत ही बाब आढळून आली आहे. १५ फेब्रुवारीच्या संध्याकाळी व रात्री अवकाळी पावसाने वाऱ्यासह जिल्ह्यात हजेरी लावली. बुलढाणा, खामगाव व नांदुरा या तालुक्यात अवकाळीचा जोर जास्त होता. कृषी विभागाने आज शुक्रवारी केलेल्या पाहणीत या तालुक्यातील ४८ गावांना फटका बसल्याचे दिसून आले. तसेच १ हजार ८६ हेक्टर क्षेत्रावरील गहू, रब्बी ज्वारी, हरभरा व मका या पिकासह फळबागांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा – गुरुजींना दहा रुपयांचा चहा पडला नऊ लाखांना!
हेही वाचा – नागपुरातील एनकेपी साळवे इन्स्टिट्यूटच्या निवासी डॉक्टरांचे कामबंद…निदर्शने सुरू
सर्वाधिक तडाखा बसलेल्या बुलढाणा तालुक्यात ४०५ हेक्टरवरील गहू, शाळू, मका व हरभरा या पिकांची नासाडी झाली. तालुक्यातील १३ गावांतील शेतकरी बाधित झाले. खामगाव तालुक्यातील २० गावांतील ३७५ हेक्टरवरील फळबागा, गहू, हरभरा, मक्याचे नुकसान झाले. नांदुरा तालुक्यातील १५ गावांतील ३६०.५० हेक्टर क्षेत्रातील केळी, कागदी लिंबू, गहू, मका, ज्वारी पिके बाधित झाली. एकूण ४८ गावातील १०८६.५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद आहे. कृषी अधीक्षक अधिकारी मनोज ढगे यांनी जिल्हाधिकारी किरण पाटील यांना हा अहवाल सादर केला.