लोकसत्ता टीम
अमरावती : पश्चिम विदर्भात गेल्या तीन दिवसांत अवकाळी पावसाने १ लाख ७३ हजार ३२६ हेक्टरमधील शेतीपिकांचे नुकसान झाले असून सर्वाधिक १.२६ लाख हेक्टरमध्ये नुकसान यवतमाळ जिल्ह्यात झाल्याची प्राथमिक माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने शासनाकडे पाठवली आहे.
गेल्या तीन दिवसांमध्ये अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा फटका बसला. शेतीच्या नुकसानासोबतच जनावरांचाही मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी घरांचीही पडझड झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यात १ लाख २६ हजार ४३७ हेक्टर शेतजमिनीवरील पिके, फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यात ३३ हजार ९५१ हेक्टर शेती पाण्यात गेली आहे. अकोला जिल्ह्यातील १० हजार ४६५ हेक्टर आणि वाशीम जिल्ह्यातील ४६२ हेक्टरमधील शेतपिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अमरावती जिल्ह्यात तीन दिवसांत शेतीपिकांच्या नुकसानीची नोंद नाही.
आणखी वाचा-वर्धा : अल्पवयीन मुलीचे अपहरण, आरोपी सापडला साताऱ्यात
रविवारी बुलढाणा जिल्ह्यात ३३ हजार ९५१ हेक्टरमध्ये, तर वाशीम जिल्ह्यात ४६२ हेक्टरमधील शेतजमिनीवरील पिके उद्ध्वस्त झाल्याचे अहवालात नमूद आहे. सोमवारी बुलढाणा जिल्ह्यात २०११ हेक्टरमध्ये, अकोला ४६०८ हेक्टर आणि मंगळवारी यवतमाळ जिल्ह्यात १ लाख २६ हजार हेक्टर आणि अकोला जिल्ह्यात ५ हजार ८५७ हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे २६ नोव्हेंबर रोजी वाशीम जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर २६ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत अमरावती विभागात ५७१ जनावरे दगावली आणि १०१ घरांची पडझड झाली.