लोकसत्ता टीम
अमरावती: एकीकडे अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणासह दोन प्रकल्पांमधून पाणी सोडले जात असताना अजूनही शहानूर मध्यम प्रकल्प दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या या धरणात केवळ ३३.८६ टक्केच पाणीसाठा झाला आहे. एकाच जिल्ह्यातील धरणांचे हे विरोधाभासी चित्र आहे.
अमरावती विभागातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात रविवारी सकाळी ८ वाजता ४०२.८२ दशलक्ष घनमीटर (७१.४२ टक्के) जलसाठ्याची नोंद घेतली गेली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने येवा वाढत आहे. अशा स्थितीत नियोजनाचा भाग म्हणून धरणांमधील जादा पाणी सोडून देण्यात येते. शनिवारी सकाळी अप्पर वर्धा धरणाचे अकरा दरवाजे उघडण्यात आले. या धरणातून १३३५ घनमीटर प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू होता. अप्पर वर्धा धरणाच्या परिसरात गेल्या १ जूनपासून ४८४ मिमी पाऊस झाला आहे.
आणखी वाचा-‘ऑनलाईन गेम’च्या नावे गंडा, व्यापाऱ्याने गमावले ५८ कोटी; मित्रानेच रचला पैसे उकळण्यासाठी डाव
दर्यापूर व अंजनगाव सुर्जी या दोन तालुक्यांची तहान भागवणाऱ्या शहानूर मध्यम प्रकल्पात केवळ ३३.८६ टक्के पाणी उपलब्ध आहे. अंजनगाव सुर्जी व दर्यापूर या दोन शहरांसह तालुक्यातील १५६ व वाढीव गावे ७९ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या शहानूर मध्यम प्रकल्पात ३१ जुलैपर्यंत ५२ टक्के पाणीसाठा आवश्यक आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनपर्यंत चांगला पाऊस पडला नाही. गेल्या १ जूनपासून केवळ १५५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या धरणाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.