अकोला : पश्चिम वऱ्हाडातील अकोला आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये मतविभाजनाचा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जबर फटका बसला आहे. वंचित आघाडीची भूमिका अकोल्यात भाजपच्या, तर बुलढाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पथ्यावर पडली. बुलढाणा मतदारसंघात ठाकरे गटाला मात देण्यासाठी शिंदे गटाने मतविभाजनाची आखलेली रणनीती यशस्वी झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या विजयामुळेच जिल्ह्याला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देखील मिळू शकले.

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीची पीछेहाट झाली. राज्यात मतविभाजन फॅक्टर महत्त्वपूर्ण ठरते. ते टाळण्यासाठी वंचितला सोबत घेण्याचे प्रयत्न मविआकडून झाले. मात्र, नेहमीप्रमाणे वंचित व मविआचे सूर जुळले नाहीत. त्यामुळे ॲड. प्रकाश आंबेडकरांनी स्वबळावर उमेदवार उभे केले. त्याचा फटका मविआला काही जागांवर बसला. त्यामध्ये प्रामुख्याने अकोला आणि बुलढाण्याच्या जागेचा समावेश होतो. अकोला मतदारसंघात परंपरेनुसार तिरंगी लढत झाली. या निवडणुकीमध्ये भाजपचे अनुप धोत्रे यांना चार लाख ५७ हजार ०३०, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांना चार लाख १६ हजार ४०४ व ॲड. प्रकाश आंबेडकर यांना दोन लाख ७६ हजार ७४७ मतांवर समाधान मानावे लागले. ४० हजार ६२६ मतांनी अनुप धोत्रे यांनी डॉ. अभय पाटील यांचा पराभव केला. मुस्लीम मतदार काँग्रेसकडे वळल्याचे स्पष्ट झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वंचितच्या मतांमध्ये किंचित घट झाली, तर एक लाख ६२ हजारावर काँग्रेसची मते वाढली. तिरंगी लढतीत पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली. वंचित आणि मविआमध्ये आघाडी झाली असती तर अकोल्यात निकालाचे चित्र वेगळे असते.

हेही वाचा : चंद्रपूर : तीन ‘माजी आमदारां’पैकी एकाला ‘आजी’ आमदार करणार, धनोजे कुणबी समाजाच्या अध्यक्षांचे विधान चर्चेत

बुलढाणा मतदासंघात शिवसेना शिंदे गटासाठी लोकसभा निवडणूक अवघड समजल्या जात होती. निवडणुकीपूर्वी प्रतापराव जाधव यांच्याविषयी विरोधातील सूर होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली. शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये तुल्यबळ सामना रंगला. मतविभाजन निर्णायक ठरण्याचा अंदाज पूर्वीपासूनच वर्तवण्यात येत होता. शिवसेना शिंदे गटाकडून बुलढाण्याची जबाबदारी राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांच्यावर दिली. मतांचे विभाजन झाल्याशिवाय विजय अशक्य असल्याचे लक्षात येताच त्यांनी जोडतोडीसाठी हालचाली वाढवल्या. मतदारसंघात माळी समाजाचे मोठ्या प्रमाणावर मतदान असल्याने वंचितने गत निवडणुकीप्रमाणे त्या समाजालाच प्रतिनिधित्व दिले. वंचित जेवढे जास्त मतदान घेईल, तेवढा शिवसेना ठाकरे गटाला फटका बसेल, अशी चिन्हे होती. त्यामुळे वंचितचे मते वाढविण्याचे प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. शेतकरी संघटनेतील काही नाराज पदाधिकाऱ्यांना देखील सोबत घेण्याचे प्रयत्न शिंदे गटाने केल्याचे बोलल्या जाते. त्यामध्ये रामेश्वर पवळ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. शिवसेना शिंदे गटाच्या दृष्टीने त्याचा सकारात्मक परिणाम झाला. २९ हजार ४७९ मतांनी प्रतापराव जाधवांनी ठाकरे गटाचे खेडकर यांना पराभूत केले. वंचितचे वसंत मगर यांनी ९८ हजार ४४१ मते घेतली. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अपक्ष निवडणूक लढत दोन लाख ४९ हजारावर मते मिळवली. बुलढाण्यात मतविभाजनाचे गणितच शिवसेना शिंदे गटासाठी पोषक ठरल्याचे निकालावरून स्पष्ट होते.

हेही वाचा : शुभमंगल सावधान! सर्वधर्मीय १०८ जोडप्यांचा शाही सामूहिक विवाह सोहळा, ३० वर्षांत २२०० वधु-वरांचे शुभविवाह

पडद्यामागच्या हालचाली निर्णायक

बुलढाणा मतदारसंघात शिवसेनेच्या दोन्ही गटात अटीतटीची लढत होणार असल्याचे सुरुवातीपासूनच निश्चित होते. त्यामुळे पडद्यामागच्या हालचालींना वेग आला होता. उमेदवारांकडून मतजोडणीसह प्रतिस्पर्धीचे मते विविध मार्गाने कमी करण्याचे प्रयत्न झाले. शिंदे गटाने त्यात आघाडी घेऊन अखेर बाजी मारली.