यवतमाळ: उद्योगपती मित्रांसाठी काम करणाऱ्या या सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांशी कसलेही देणे-घेणे नाही. केंद्र व राज्यातील भाजप सरकार शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागले आहेत. त्यांना जनसामान्यांच्या सुख-दुःखाचे सोयरसुतक नाही, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी काँग्रेसची जनसंवाद यात्रा यवतमाळमध्ये दाखल झाली. काँग्रेस नेत्यांनी यात्रेअंतर्गत वडकी, राळेगाव, आर्णी आदी ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी वडेट्टीवार बोलत होते. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीनंतर सरकार आर्थिक साहाय्य करणार होते. ५० हजारांचा प्रोत्साहन भत्ता जाहीर करण्यात आला. त्यानंतर शेतकरी सन्मान निधीच्या गोष्टी केल्या. मात्र अजूनही खात्यात अनुदान आले नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा… अमरावती : घरगुती वादातून पतीने पत्नीची दगडाने ठेचून केली हत्या आणि स्वतःच फोन करून दिली माहिती

यवतमाळ येथील कळंब चौकात काँग्रेसतर्फे यात्रेचे स्वागत करण्यात आले. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करीत असलेल्या आंदोलकांशी वडेट्टीवार यांनी आर्णी वळण रस्त्यावर संवाद साधला. त्यानंतर माळम्हसोला येथील शेतात वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शेतकरी, तसेच नागरिकांशी संवाद साधला. सोयाबीनची अवस्था वाईट आहे, कापसाचे भाव पडलेले आहेत, शेतकऱ्याला चार पैसे मिळतील असे वाटत असताना सरकारने कांदा निर्यातीवर ५० टक्के टॅक्स लावला. आता तांदळावरही २० टक्के टॅक्स लागू केला आहे. दुसरीकडे अदानी सारखे उद्योगपती मोठमोठ्या वखारी खोलून स्वस्तात शेतमाल खरेदी करतील आणि दरवाढ झाल्यानंतर हाच शेतमाल दामदुपटीने आपल्या माथी मारतील, अशी सारी व्यवस्था मोदी सरकारने देशात उभी केली आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

हेही वाचा… कुलर ठरला किलर! विजेचा धक्का लागून मायलेकाचा मृत्यू; आर्णी तालुक्यातील घटना

सध्या राज्यातील परिस्थिती विदारक झाली आहे, मराठा आंदोलकांवर लाठीमार होतो आहे. जालना लाठीमार प्रकरणात दुय्यम अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तेथील सर्वांचीच ‘नार्को टेस्ट’ करावी, म्हणजे कोणी आदेश दिले हे पुढे येईल, अशी मागणी त्यांनी केली. मागासवर्गीयांवरील अत्याचार वाढले आहेत, महिला अत्याचाराच्या प्रमाणातही वाढ झाली आहे, अशा परिस्थितीत राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न पडतो, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा… भाजी विक्रेत्याने बाजारातून चोरल्या तब्बल ३१ दुचाकी! मध्यप्रदेशात कवडीमोल भावाने विक्री

यावेळी माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, आमदार वजाहत मिर्झा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर, यवतमाळ काँग्रेस प्रभारी संजय राठोड, जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर, जावेद अन्सारी, अनिल गायकवाड, दिनेश गोगरकर, चंद्रशेखर चौधरी, प्रदीप साळवे, संजय भोयर, नारायण राठोड, सरपंच उमेश चव्हाण, ओम तिवारी आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

‘इंडिया’चा धसका, भाजपला २०० जागाही मिळणार नाही

भाजपविरोधात ‘इंडिया’ आघाडीची एकजूट पाहून भाजपने धसका घेतल्यानेच केंद्र सरकारने ‘इंडिया’ऐवजी भारत असे नाव बदलल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशात २०० पेक्षा कमी जागा मिळतील, असे सर्व्हे येत असून पुढील काळात एकजुटीने काम केल्यास भाजपची आणखी घसरण होईल, असे ते म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay wadettiwar accused the bjp government about the farmers problems nrp 78 dvr
Show comments