नागपूर : मुस्लीमांच्या आरक्षणासाठी महाविकास आघाडी आग्रही आहे. आघाडीचे सरकार असताना करोना साथ आल्याने त्यावर काम होऊ शकले नाही. पण, विद्यमान सरकार समाज द्वेषातून मुस्लीमांना पाच टक्के आरक्षण देण्यास टाळाटाळ करीत आहे, अशी टीका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
विधिमंडळ अधिवेशन , गुरुवारपासून सुरु होत आहे. त्यापूर्वी वडेट्टीवार यांनी आज महाविकास आघाडीची भूमिका मांडली. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, मराठा आणि मुस्लिम आरक्षण देण्यात काहीच अडचण नाही. महाविकास आघाडी सरकारचे अडीच वर्षांपैकी २० महिने करोना स्थिती हाताळण्यात आणि राज्य पूर्वपदावर आणण्यात गेले. संपूर्ण देशाची आणि जग करोनाशी झुंज देत होता. त्यामुळे मुस्लीम आरक्षणासंदर्भात पुढची प्रक्रिया करण्यास वेळ मिळाला नाही. पण आम्ही मुस्लीमांना पाच टक्के आरक्षण मिळावे यासाठी आग्रही आहोत. विद्यमान सरकार मात्र समाज द्वेषातून मुस्लीम आरक्षणाबाबत निर्णय घेत नाही, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.
हेही वाचा >>>“चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्याघ्र सफारी प्रकल्प,” वनमंत्री मुनगंटीवार म्हणतात…
काँग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजास १६ टक्के व मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षणाचा अध्यादेश २१ जुलै २०१४ रोजी संमंत करून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये मुस्लीम समाजातील ५० प्रवर्गांना पाच टक्के आरक्षण दिले गेले. परंतु, ते आरक्षण टिकू शकले नाही. उच्च न्यायालयाने राज्यातील मुस्लिम समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक स्थितीचे अवलोकन करून मुस्लिमांना शिक्षण क्षेत्रात पाच टक्के आरक्षण द्यावे, असा स्पष्ट निर्वाळा दिला. राज्यात मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने मराठा आरक्षणासाठी समिती स्थापन केली आहे. पण, मुस्लिम समाजास आरक्षण देण्यासाठी काही पावले उचलण्यात आलेली नाहीत. हाच संदर्भ देत महाविकास आघाडी आणि विद्यमान सरकार मुस्लीमांना आरक्षण देत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्यावर वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडी मुस्लिमांच्या पाच टक्के आरक्षणासाठी आग्रही असून तो मुद्दा लावून धरण्यात येईल, असे सांगितले.