वर्धा : लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार रामदास तडस यांना मागे टाकत अमर काळे यांना तब्बल वीस हजारांचे मताधिक्य हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात मिळाले. विद्यमान आमदार समीर कुणावार यांना यामुळे मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. त्यातच या विधानसभा क्षेत्राचा सलग तीन वेळा कुणास विजय न देण्याचा लौकिक निर्माण झाल्याचे दिसून येते.

कधीकाळी काँग्रेसचा गड राहिलेल्या या मतदारसंघात धनराज कुंभारे हे १९८० सळी निवडून आलेले काँग्रेसचे शेवटचे आमदार ठरले. त्यानंतर दोन वेळा शेतकरी संघटनेचे डॉ. वसंत बोन्डे, पुढे दोन वेळा शिवसेनेचे अशोक शिंदे, त्यानंतर एकदा राष्ट्रवादीचे राजू तिमांडे आणि २०१४ पासून भाजपचे समीर कुणावार आमदार आहेत. आता अमर काळे यांना २० हजार ५५५ मते तडस यांच्यापेक्षा अधिक मिळाल्याने कुणावार यांच्यासाठी हे आव्हान समजल्या जात आहे. कारण यापूर्वी तडस यांना याच मतदारसंघाने भरभरून मते दिली होती. त्यातच हॅटि्ट्रक करू न देण्याचा या क्षेत्राचा स्वभाव झाल्याचे म्हटल्या जात असल्याने कुणावार यांचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा…नातवाचा खून, आजोबांचा गळफास; उमरखेड तालुक्यातील घटनेच्या तपासाचे पोलिसांपुढे आव्हान

विशेष म्हणजे, तडस व कुणावार यांचे सख्य राहिले नसल्याचे बोलल्या जाते. नागो गाणार यांच्या विधान परिषद निवडणुकीवेळी आमदार कुणावार हे वेळेवर तीर्थायात्रेस निघून गेले होते. तेव्हा पक्ष नेतृत्वाने तडस यांना हिंगणघाट क्षेत्राची जबाबदारी सोपविली होती. हे शोभते का यांना, अशी प्रतिक्रिया देत तडस यांनी रोष व्यक्त केला होता. तसेच बाजार समिती निवडणुकीत कुणावार यांनी सुधीर कोठारी व आमदार रणजित कांबळे यांच्या पॅनलसोबत मैत्री करीत दोन जागा पदरात पडून घेतल्या होत्या. तेव्हा भाजपनिष्ठ पदाधिकारी संतापले होते. म्हणून परत रामदास तडस यांनी हिंगणघाट येथे ठिय्या देत भाजपचे पॅनल टाकले होते. भाजपचा आमदार काँग्रेस नेत्यांसोबत असे चित्र वरिष्ठनाही चकरावणारे ठरले होते. तडस येथे मागे पडण्यामागे असाही दाखला दिल्या जातो. पण मुख्य बाब म्हणजे कुणावार यांना तिकीट मागण्यात पक्षात कुणीच सक्षम स्पर्धक नाही. भाजपचा अन्य बडा नेता नसल्याने कुणावार हेच परत लढतील, हे स्पष्ट आहे. पण मतदारसंघाचा स्वभाव व भाजप या लोकसभा निवडणुकीत येथे मागे पडल्याने कुणावार हे आव्हान झेलणार कसे, अशी चर्चा होत आहे.

हेही वाचा…‘वंचित’ची भूमिका भाजप व शिंदे गटाच्या पथ्यावर; पश्चिम वऱ्हाडात महाविकास आघाडीला…

येथे काँग्रेस आघाडीतर्फे आता अतुल वांदिले यांचे नाव आघाडीवर आहे. तसेच सुधीर कोठारी पण स्पर्धेत येवू शकतात. माजी आमदार राजू तिमांडे पण आहेतच. पण शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या सभेवेळी ते नाहक चर्चेत आले होते. भाजपला लक्षनीय कमी मते मिळाल्याने ही मंडळी हरखून गेली, हे मात्र निश्चित.