वर्धा : पी. एम. विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त उभारण्यात आलेल्या थीम पॅव्हेलियनमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या १८ कलाकृतींच्या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या प्रदर्शनीचा रविवारी सायंकाळी समारोप झाला. स्वतः पंतप्रधान मोदी यांनी डिजिटल पेमेंट करीत काही वस्तू उद्घाटनप्रसंगी खरेदी केल्या होत्या. या प्रदर्शनीला वर्धेच्या नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत स्टॉलवर विक्रीसाठी लावण्यात आलेल्या दहा लाख रुपयांच्यावर वस्तूची खरेदी केली.

या प्रदर्शनीमध्ये भारतातील उत्तराखंड, बिहार, नागालँड, मध्यप्रदेश, केरळ, ओडीशा, झारखंड, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, आसाम, तेलंगणा, पंजाब, उत्तरप्रदेश, जम्मू आणि कश्मीर, महाराष्ट्रात, कर्नाटक, राजस्थान व गुजरात राज्यातील हस्तकला कारागीरांनी तयार केलेल्या वस्तू प्रदर्शनीत लावून विक्री केली.

हेही वाचा – युद्धग्रस्त इस्रायलसाठी राज्यातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण ! कुशल कामगारांचा तुटवडा असल्याचे कारण

पंढरपूर येथील पीएम विश्वकर्मा योजनेची लाभार्थी निरंजन पानकर या तुळशीमाळ कारागिरांनी तयार केलेल्या तुळशीमाळ स्टॉलला वर्धेकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून लाभार्थ्यांच्या वतीने स्टॉलवर तुळशी वृक्षापासून माळा तयार करुन विक्री होत असल्यामुळे नागरिकांचा मोठा उत्साह पहावयास मिळाला.

गुजरात व मध्य प्रदेश येथील सोनार या कारागीरांची चांदीवर्क मूर्तीकलेची दोन दिवसात एक लाख रुपयांच्यावर विक्री झाली असल्याचे कारागीरांनी सांगून त्यांनी तयार केलेल्या मूर्ती कलेला वर्धेकरांनी चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे सांगितले. जम्मू काश्मीर येथील रुमी जान यांनी टेलरिंग व्यवसायासाठी या योजनेची मदत घेतली. एक लाख रुपयाचे कर्ज मिळाले आणि त्यांचा छोटा व्यवसाय मोठा झाला. शाल, उनी वस्त्र, घरगुती कपडे तयार केले जातात. प्रदर्शनीत चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्या सांगतात.

हेही वाचा – गोंदिया : वर्चस्वाच्या झुंजीत टी-९ वाघाचा मृत्यू; नवेगाव-नागझिरा अभयारण्याच्या गाभा क्षेत्रातील घटना

प्रदर्शनीला २० हजार प्रेक्षकांनी भेट देऊन कारागीरांनी तयार केलेल्या वस्तूचे व उत्कृष्ट अशा प्रदर्शनीचे कौतुक केले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी २१ व २२ सप्टेंबर दोन्ही दिवस प्रदर्शनात उपस्थित राहून कारागिरांच्या भेटी घेतल्या. त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही यावर जातीने लक्ष दिले. तसेच प्रोत्साहनही दिले. ग्रामीण व शहरी भागातील पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेच्या लोकांना ओळख प्राप्त करून देण्यासाठी तसेच त्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी केंद्र शासनाने ही योजना सुरू केली आहे. प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेने हे देशभरातील कारागीर भारावून गेले होते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या १८ कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून गेल्या.