लोकसत्ता टीम वाशीम: जिल्ह्यातील मंगरूळपीर आणि मालेगाव तालुक्याला आज, रविवारी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस व गारपिटीचा जोरदार तडाखा बसला, तर इतर तालुक्यात ढगाळ वातावरण होते. गारपिटीने फळबागा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात ‘येलो अलर्ट’चा इशारा दिला होता. गेल्या दोन दिवसांपासून विजेच्या कडकडटासह ढग दाटून येत आहेत. काही भागात हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस कमी अधीक प्रमाणात होत आहे. आज, रविवारी मालेगाव तालुक्यातील मुंगळा आणि मंगरुळपीर तालुक्यातील मोहगाव्हण येथे जोरदार गारपीट झाली. इतर तालुक्यात दुपारनंतर अचानक वादळी वारा सुटला होता. गारपिटीचा फळबागा आणि इतर पिकांना मोठा फटाका बसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.