अमरावती : अमरावती विभागात पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा करणाऱ्या टँकरची संख्‍या यंदा पावसाळा सुरू होताच वाढली आहे. जूनच्‍या सुरुवातीला विभागात ९९ गावांना टँकरच्‍या साहाय्याने पाणीपुरवठा सुरू होता, ती संख्‍या आता १०५ वर पोहोचली आहे. गेल्‍या वर्षी याच कालावधीत ३४ गावांमध्‍ये टँकरचा आधार होता.

पावसाळा सुरू होऊन तीन आठवडे उलटून गेल्‍यानंतर अमरावती विभागात दुष्‍काळाचे सावट दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे. गेल्‍या वर्षभरापासून पिण्‍यासाठी, पशुधनासाठी आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्‍याच्‍या बाबतीत मोठा प्रश्‍न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. गेल्‍या वर्षी याच कालावधीत ३४ गावांमध्‍ये ३८ टँकरने पाणीपुरवठा करण्‍यात येत होता. यंदा मार्च अखेरीस केवळ बुलढाणा जिल्‍ह्यात २६ गावांमध्‍ये टँकरने पाणी पुरविण्‍याची वेळ आली होती. इतर जिल्‍ह्यांमध्‍ये टँकर सुरू करण्‍यात आले नव्‍हते. पण, आता अकोला वगळता विभागातील इतर चारही जिल्‍ह्यांमध्‍ये टँकर सुरू आहेत. सद्यस्थितीत बुलढाणा जिल्‍ह्यात ७४ गावांमध्‍ये ८१ टँकर, अमरावती जिल्‍ह्यात १४ गावांमध्‍ये १८ टँकर, यवतमाळ जिल्‍ह्यात १४ गावांमध्‍ये १४ तर वाशिम जिल्‍ह्यात ३ गावांमध्‍ये ३ टँकरमधून पाणी पुरविण्‍यात येत आहे.

हेही वाचा – “निराधार ज्येष्ठ नागरिकांना पाच हजार अर्थसहाय्य देणे न्यायसंगत नाही,” राज्य सरकारने स्पष्टच सांगितले…

बुलढाणा जिल्‍ह्यातील देऊळगाव राजा, चिखली, बुलढाणा, मेहकर, मोताळा, लोणार, सिंदखेड राजा, या सात तालुक्‍यांतील ७४ गावांना ८१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्‍यात येत आहे. २ लाख २० हजार ८२९ नागरिकांची तहान अद्यापही हे टँकर भागवत आहेत. बुलढाणा तालुक्‍यात १७ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्‍यात येत आहे. दुसरीकडे, २९१ गावांची तहान ही अधिग्रहित विहिरींवर अवलंबून आहे. ३४९ विहिरी त्‍यासाठी अधिग्रहित करण्‍यात आल्‍या आहेत. अमरावती जिल्ह्यातील १४ गावांत १८ खासगी टँकरद्वारे पाणी पुरविण्‍यात येत आहे. याशिवाय ८३ गावांमध्ये ३७ बोअरवेल व ६३ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

अमरावती विभागात आतापर्यंत १३५.५ मिमी म्‍हणजे सरासरीच्‍या ९८.३ टक्‍के पावसाची नोंद झाली असली, तरी अद्याप शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. एकीकडे खरीप हंगामासाठी पेरणीची लगबग आणि त्‍याचवेळी पाणीटंचाईची स्थिती, असा प्रसंग उद्भवला आहे. जुलै महिन्‍यात दमदार पावसाचा अंदाज असून त्‍याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंना अर्थसंकल्प समजत नाही, त्यामुळे…”, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची टीका; म्हणाले…

अमरावती जिल्‍ह्यात आतापर्यंत ११७.२ मिमी (८६.२ टक्‍के) पावसाची नोंद झाली आहे. अकोला जिल्‍ह्यात ११५.४ मिमी (९०.३ टक्‍के) बुलढाणा जिल्‍ह्यात १४३.२ मिमी (११० टक्‍के), वाशिम जिल्‍ह्यात १६२.७ मिमी (१०४ .८ टक्‍के) पाऊस झाला आहे.

अमरावती विभागातील बहुतांश शेती ही कोरडवाहू आहे. निसर्गावर अवलंबून असलेल्‍या शेतात महागडे बियाणे टाकणे जोखमीचे होऊन जाते. सिंचन क्षेत्रातील मागासलेपणाचा प्रश्‍न अजूनही भेडसावत आहे. त्‍याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. पश्चिम विदर्भात दोन आठवड्यांपूर्वी मोसमी पावसाचे आगमन झाल्‍यानंतर शेतकरी पेरणीच्‍या कामाला लागले होते, पण पावसाने आशा दाखवून पाठ फिरवली.