लोकसत्ता टीम

अकोला : हिंदूंवर बांगलादेशमध्ये अन्याय होत आहेत. कारण त्या ठिकाणी हिंदू दुर्बल झाला. तोच प्रयोग आपल्याकडे सुद्धा सुरू झाला आहे. आज मतांसाठी बांगलादेशीयांना संरक्षण देण्याचे काम काही पक्ष करीत आहेत. या पक्षांना हे लक्षात येत नाही की निवडणूका व सरकार येतील-जातील, पण आस्तिनचे साप अशा प्रकारे संरक्षित केले तर उद्या तुमचे परिवार देखील संरक्षित राहणार नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हा केवळ योगायोग नव्हे तर प्रयोग सुरू आहे. भारताला खिळखिळे करण्याच्या प्रयोगामध्ये अनेक लोक आहेत. जाणतेपणाने तर काही अजाणतेपणाने आहेत. विषमतेचे बीज पेरण्याचे काम केले जात आहे. समाजाला खंडित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. बलशाली भारत निर्माण करण्यासाठी आपल्याला या प्रयोगाचा सामना करावा लागेल. सर्वांना सतर्क होऊन मैदानात उतरावे लागेल, असे देखील ते म्हणाले.

आणखी वाचा- भाजप लोकसभेत ‘मविआ’तील तीन पक्षांसह ‘या’ चौथ्याविरोधात लढला – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय नियोजनपूर्वक घेतला. आपला निर्णय काँग्रेस सारखा नाही. हे कसे लबाड आहेत, तेच आपसात सांगू लागले आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली. सरकारवर कुठलाही बोजा न पडता शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल. पाच वर्ष शेतकऱ्यांना वीज बिल येणार नाही. शेतकऱ्यांचे विचार करणारे हे सरकार आहे. विदर्भातील दुष्काळ संपवणारा वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाला मान्यता दिली. काँग्रेस व राष्ट्रवादीने एवढे वर्ष राज्य केले, मात्र त्यांनी कधी विदर्भाच्या सिंचन प्रकल्पाला निधी दिला का? असा सवाल फडणवीस यांनी केला.

ज्या ठिकाणी हिंदू दुर्बल होतो, त्या ठिकाणी त्यांना गुलामीचा सामना करावा लागतो. हिंदू मजबूत असल्यास राज्य करतो. कुठल्या जाती, धर्माला कमी लेखायचे नाही. बांगलादेशामध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे. आज तोच प्रयोग आपल्याकडे सुद्धा सुरू झाला. मतांसाठी काही पक्ष बांगलादेशीयांना संरक्षण देण्याचे काम करीत आहे, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केला. अकोला येथे ते पक्षाच्या बैठकीत बोलत होते.

आणखी वाचा-पाणीसाठा ६९ टक्‍क्‍यांवर, विदर्भातील ६ मोठ्या प्रकल्‍पांमधून विसर्ग

आता पोलखोल करणार

दररोज खोटी माहिती पसरवून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम विरोधक करतात, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. विरोधकांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. आता खोटारडेपणाविरोधात पोलखोल उपक्रम राबविणार आहे. समाज माध्यमांचे महत्त्व जाणून घ्या, असे ते कार्यकर्त्यांना म्हणाले.