नागपूर : ‘एमपीएससी’ची तयारी करताना एक दिवस दहा तास आणि पुढचे चार दिवस दोन तास अभ्यास करून यश मिळवता येत नाही. ध्येय ठरवून अभ्यास करावा लागतो. आपल्याला या परीक्षेसाठी किती वर्षे द्यायची आहेत हे आधीच निश्चित हवे. आत्मपरीक्षण करून आपल्यातील शक्ती आणि उणिवा ओळखल्या तरच यश मिळवता येईल, असे मत ‘एमपीएससी’द्वारे उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेल्या आणि राज्यात मुलींमधून पहिल्या आलेल्या वैष्णवी बावस्कर यांनी व्यक्त केले. ‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान त्यांनी ‘एमपीएससी’च्या विविध परीक्षांच्या तयारीवर सविस्तर चर्चा केली.

वैष्णवी यांनी सांगितले की, विदर्भात ‘एमपीएससी’च्या अभ्यासासाठी पूरक असे वातावरण नाही. शिवाय इथल्या विद्यार्थ्यांचा या परीक्षांकडे फारसा ओढाही दिसत नाही. बहुतांश विद्यार्थी बँक, पोलीस भरती किंवा खासगी क्षेत्राकडे वळतात. ज्यांना खरच अधिकारी व्हायचे आहे अशी मुले पुण्याला जातात. मात्र, तुमच्यात जिद्द आणि चिकाटी असेल तर नागपूरमध्ये राहूनही अभ्यास करता येतो. ‘एमपीएससी’ उत्तीर्ण होण्यापूर्वी मी कधी पुणे पाहिलेसुद्धा नव्हते. संपूर्ण तयारी इथेच राहून केली. ‘एनसीईआरटी’ आणि राज्य मंडळाची सर्व पुस्तके वारंवार वाचून काढली. खूप पुस्तके वाचली नाहीत किंवा बाजारात आलेले प्रत्येक नवीन पुस्तक विकतही घेतले नाही. हल्ली बाजारात नवीन पुस्तके आली की त्याचे फार आकर्षण असते. मात्र, पुस्तकांचे केवळ मुखपृष्ठ आणि त्यातील मांडणी तेवढी बदललेली असते. मजकूर सारखाच असतो. त्यामुळे अशा आकर्षणाला बळी न पडता स्वत: टिपण काढा, असा सल्ला वैष्णवी यांनी दिला.

हेही वाचा – Mumbai Local Train Update : दिवा-कोपरदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत; प्रवाशांना मनस्ताप

चौथ्या प्रयत्नात उपजिल्हाधिकारी

प्राथमिक शिक्षण महापालिकेच्या तर माध्यमिक शिक्षण केशवनगर शाळेत झाले. सुरुवातीला डॉक्टर बनायची खूप इच्छा असल्याने बारावीत विज्ञान शाखेतून शिक्षण घेतले. मात्र, ‘नीट’मध्ये चांगले गुण न मिळाल्याने ही संधी हुकली. त्यानंतर फॉरेन्सिक विज्ञान शाखेतून बी.एस्सी. अंतिम वर्षापासून (२०१९) स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. कराेना काळात अभ्यासाला चांगली संधी मिळाली. सोबत चांगला समूह मिळाल्याने त्याचा खूप फायदा झाला. २०२०, २०२१ आणि २०२२ अशी तीनदा परीक्षा दिली. मुलाखतीपर्यंत गेले, मात्र राज्यसेवा परीक्षेत यश आले नाही. दरम्यान, २०२२ ला संयुक्त परीक्षेतून सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर निवड झाली. तरीही २०२३ ची राज्यसेवा परीक्षा दिली. यात यश मिळाले आणि उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली, असे वैष्णवी यांनी सांगितले.

अपयश येणारच, पण…

‘एमपीएससी’ उत्तीर्ण होण्यासाठी योग्य दिशा आणि मार्गदर्शन हवे. मला विभा जाधव आणि विशाल नागपुरे या दोघांचे मार्गदर्शन लाभले. ‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या प्रगती जगताप या आदर्श होत्या. २०२० मध्ये त्यांची निवड झाली. त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. ‘एमपीएससी’ परीक्षेत अपयश येण्याची शक्यता असतेच. त्यामुळे सकारात्मक लोक सभोवताली हवे. त्यामुळे नैराश्य येत नाही. तीन ते चार प्रयत्नात पूर्व परीक्षाही उत्तीर्ण होता येत नसेल तर दुसऱ्या परीक्षेचा विचार करावा, असा सल्ला वैष्णवी यांनी दिला.

हेही वाचा – राज्याचे गृहनिर्माण धोरण पुन्हा लांबणीवर

सरळसेवेसह पाच परीक्षा उत्तीर्ण

२०१९ ला वडिलांचे निधन झाले. आई रुग्णालयात नोकरीला होती. तिने कायम साथ दिल्याने एमपीएससीत यश मिळवता आले. मी सरकारी अधिकारी व्हायचेच असा निर्णय घेतला होता. दरम्यान, घरीच शिकवणी घेतली. याचाही मला अभ्यासात फायदा झाला. राज्यसेवा देत असताना सरळसेवा परीक्षाही दिल्या. वनविभाग, तलाठी आणि नगरपरिषद अशा तीन ठिकाणी निवड झाली होती. पुढे संयुक्त परीक्षा आणि एमपीएससीतही यश मिळवले. त्यामुळे कुठलीच परीक्षा कमी नसून प्रत्येकातून नवीन काहीतरी शिकता येते. एखादी नोकरी मिळाली तरी आपण स्थिर होतो. त्यामुळे परीक्षा देत राहावे. भविष्यात मला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे असून पाच अधिकारी तरी घडवणारच, असा संकल्पही वैष्णवी यांनी केला.