चंद्रपूर : खासगी व शासकीय वीजनिर्मिती केंद्राच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात ४४२० मे. वॅ. वीजनिर्मिती होते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झुडपी व मोठे जंगल आहे. रात्रीपाळीत शेतकरी कृषिपंपातून शेतीला पाणीपुरवठा करीत असतात. यावेळी हिंस्त्र प्राणी शेतकऱ्यावर हल्ला करीत असतात. यात शेकडो शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. २ दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात २४ तास थ्री फेज वीजपुरवठा न केल्यास जिल्ह्यातील वीज वितरण कार्यालयाला टाळे बंद आंदोलन करण्याच्या इशारा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी ऊर्जामंत्र्यांना दिला आहे.
कृषी पंपांना अखंडित वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत. १ एप्रिल २०२० पासून जिल्ह्यात कृषिपंप जोडणीच्या मागण्या प्रलंबित आहेत. ज्यांना कनेक्शन दिले त्यांना अखंडित वीजपुरवठा होत नाही. म. रा. वि. वि. कंपनीने थ्री फेज वीजपुरवठ्याचे जिल्ह्यात वेळापत्रक घोषित केले आहे. आठवड्यातून ४ दिवस आणि ३ दिवस रात्री ८ तास कृषिपंपाना वीजपुरवठा करण्यात येत आहे. परंतु, २४ तास थ्री फेज पुरवठा दिल्यास शेतकऱ्यांना सोयीचे होईल. महाजनकोकडून ग्रीड मार्फत संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गरजेनुसार थ्री फेज वीजपुरवठा मिळालाच पाहिजे ही आग्रही भूमिका असून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपण रस्त्यावर उतरू, असा इशारा धानोरकर यांनी दिला आहे.
हेही वाचा – तिघांचा खून करणाऱ्याला फाशीची शिक्षा मिळणार? उच्च न्यायालयात मंगळवारी निर्णय…
ग्रामीण भागात असल्यामुळे वीजपुरवठा १ फेज असल्यामुळे इतर उपकरणे चालत नाही. पाणी टाकी वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे भरली जात नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठादेखील अनेकदा सुरळीत सुरू नसतो. असे अनेक प्रश्न उद्भवत असतात. या समस्या तत्काळ निकाली काढण्याकरिता चंद्रपूर जिल्हात २४ तास थ्री फेज वीजपुरवठा करा, अशी लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.