लोकसत्ता टीम नागपूर: बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारत सरकारने देशातील सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ने सन्मानित केले. ठाकूर यांच्या शंभराव्या जयंतीच्या एक दिवस आधी ही घोषणा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घोषणा झाल्याने त्याकडे राजकीय अंगानेही बघितले गेले.असे असले तरी सरकारच्या या निर्णयाने जुने समाजवादी मात्र सुखावले आहेत. यानिमित्त ठाकूर यांच्या नागपूर दौऱ्यातील काही आठवणीना त्यांच्या सहकाऱ्यांनी उजाळा दिला.. १९८० च्या दशकातील त्यांचा नागपूर दौरा कशासाठी होता आणि पोलीस त्यांच्या मागावर कां होते व ठाकूर यांनी त्यांना कशी हुलकावणी दिली याबाबतचा सविस्तर वृत्तांत लोहिया अध्ययन केंद्राचे माजी अध्यक्ष सुरेश अग्रवाल यांनी सांगितला. आणखी वाचा-पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल रखडला; उमेदवार संभ्रमात, ‘एमपीएससी’कडे लक्ष १९८० च्या दशकात महाराष्ट्रात बॅ. ए.आर. अंतुले मुख्यमंत्री होते. तेव्हाचे विरोधी पक्ष नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनावर शेतकरी मोर्चा (दिंडी ) काढण्यात आला होता. त्याचा समारोप नागपुरात होणार होता व त्यासाठी देशभरातील शेतकरी नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यात बिहारचे शेतकरी नेते म्हणून कर्पुरी ठाकूर यांचाही समावेश होता. दुसरीकडे हा शेतकरी मोर्चा यशस्वी होऊ नये म्हणून तत्कालीन सरकारचे प्रयत्न होते. त्यामुळे या कार्यक्रमासाठी येणाऱ्यांना ताब्यात घेण्याच्या पोलिसांना सूचना होत्या. ठरलेल्या कार्यक्रमानुसार ठाकूर नागपूरमध्ये दाखल झाले. मात्र त्यांना विमानतळावरच पोलीस त्यांच्या मागावर असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ते तेथूनच भूमिगत झाले व थेट शेतकरी मोर्चाच्या सभास्थळीच उपस्थित झाले. मात्र त्यांनी भाषण केले नाही. कार्यक्रम संपल्यावरही त्यांनी दुचाकीवर विमानतळ गाठले. त्यांची दुचाकी अग्रवाल चालवत होते. त्यांनी विमानतळावर जाण्यासाठी मुख्य रस्त्याने न जाता आड मार्गाचा वापर केला व सुखरूपपणे ठाकरू यांना विमानतळावर पोहचवले होते,असे अग्रवाल यांनी सांगितले. त्यांच्याकडे कर्पुरी ठाकूर यांच्याबाबत अनेक आठवणी आहेत.