नागपूर: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी खोट्या शपथपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव आणला होता, असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला होता आणि त्याला अनिल देशमुख यांनी दुजोरा दिला होता. फडणवीस यांनी आरोप फेटाळले असले तरी शपथपत्राबाबत संदिग्धता कायम आहे. फडणवीस यांच्यावरील गंभीर स्वरुपाच्या आरोपांमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपामधील फडणवीस समर्थक देशमुख आणि मानव यांच्यावर टीका करू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष प्रहारचे प्रमुख व माजी मंत्री बच्चू कडू यांनी रविवारी विमानतळावर माध्यामांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

श्याम मानव यांनी नागपुरात घेतलेल्या सामाजिक संघटनांच्या बैठकीत राजकीय भाष्य केले होते. सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी राजकीय भाष्य करणं योग्य आहे का, असे कडू यांना विचारले असता ते म्हणाले, यात गैर काय? त्यांनीही राजकारणात यावे, स्वागत आहे. फडणवीस यांच्यावरील आरोपांबाबत कडू म्हणाले, राजकारणात असे आरोप होतच असतात. व्यक्तिगत आरोपाची दखल जनता घेत नाही हे दिसून आले आहे.

हेही वाचा – “महविकास आघाडीत ११ ‘इ-मुख्यमंत्री’; नशीब त्यांनी व्हिजिटिंग कार्ड, लेटरहेड…” मुनगंटीवार यांची टीका

तिसरी आघाडी नाही

आम्ही शेतकरी, कामगार यांच्यासाठी एकत्रपणे लढा देण्यासाठी आघाडी तयार करीत आहोत. पण तिला तिसरी आघाडी म्हणू नका, कारण तिसरी आघाडी म्हणजे केवळ निवडणुका लढण्यासाठी केलेली आघाडी असते. कोण किती जागा लढवणार हेच तिसऱ्या आघाडीचे काम असते म्हणून आम्ही आमच्या आघाडीला तिसरी आघाडी म्हणत नाही. हा शब्दसुद्धा आम्ही वापरणार नाही. आघाडीत सर्वांचे स्वागत आहे. जरांगे पाटीलसुद्धा या आघाडीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सहभागी होऊ शकतात. येत्या ९ ऑगस्टला औरंगाबाद येथे शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात तीन लाखांहून अधिक शेतकरी, शेतमजूर सहभागी होतील. त्यानंतर आघाडीच्या पुढच्या कामाची दिशा ठरवली जाईल, असे कडू म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या जरांगे यांच्या आंदोलनामुळे जातीय तेढ वाढत आहे का? असे कडू यांना विचारले असता ते म्हणाले असे होऊ नये यासाठी आम्ही पुढाकार घेऊ. जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उतरावे.

हेही वाचा – सीमा तपासणी नाक्यांवर आता तासाला केवळ पाच जड वाहनांची तपासणी

बच्चू कडू यांचा महायुती सरकारला पाठिंबा असला तरी ते वेळोवेळी सरकारला धारेवर धरण्याची संधी सोडत नाही. फडणवीस – देशमुख आरोप प्रत्यारोप प्रकरणातही त्यानी सावध भूमिका घेतली. फडणवीस यांची बाजू घेतली नाही व टीकाही केली नाही. श्याम मानव यांच्या बाबतीत त्यांनी अशीच भूमिका घेतली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू महायुतीसोबत राहणार की लोकसभेप्रमाणे स्वतंत्र चुल मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.