नागपूर – नियम कडक केले, दंड वाढवला, कायदे कठोर केले; पण अपघात थांबलेले नाहीत. रस्ते अपघातात लोक सातत्याने मृत्यूमुखी पडत आहेत, याची मला खंत आहे. पण येणाऱ्या पिढीने वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी शालेय जीवनापासूनच त्यांना धडे मिळायला हवे. त्यासाठी मुख्याध्यापक, प्राचार्य, एनजीओ या साऱ्यांनी मिळून प्रयत्न करायला हवेत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी नागपूरमध्ये म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धरमपेठ येथील वनामती सभागृहात आयोजित रस्ते सुरक्षा अभियान कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी गडकरी यांची मुलाखत घेतली. यावेळी नानांनी आपल्या दिलखुलास प्रश्नांनी मुलाखत रंगवली. “अपघात कमी करू शकलो नाही म्हणून आपण जाहीर खंत व्यक्त केली, पण जनता म्हणून आम्ही कुठे कमी पडतोय?”, असा प्रश्न नाना पाटेकर यांनी विचारला. त्यावर गडकरी म्हणाले, देशात वर्षाला पाच लाखांपेक्षा जास्त अपघात होतात. १ लाख ६८ हजार मृत्यू होतात. मृत्यू होणाऱ्यांमध्ये १८ ते ३४ वर्षे वयोगटाच्या तरुणांचे ६५ टक्के प्रमाण आहे. ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. एखाद्या कुटुंबातील तरुणाचा मृत्यू झाला की त्याच्या कुटुंबाचे मोठे नुकसान होत असते. अपघात होण्यामागची कारणे शोधून त्यावर आम्ही उपाययोजना करतोय. रोड इंजिनिअरिंगमध्ये असलेल्या त्रुटी सुधारण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी ३६०० ब्लॅक स्पॉट शोधून काढले आहेत. चारचाकींमध्ये सहा एअरबॅग्स अनिवार्य केल्या आहेत. ट्रकच्या कॅबिनमध्ये एअरकंडीशन अनिवार्य करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गावरील घटनेनंतर बस कोड तयार केला आहे. जर्मनी, इंग्लंडमध्ये आहेत तशा व्हॉल्वो बस लवकरच भारतातही बघायला मिळतील. याहीपलीकडे सर्वांत महत्त्वाचे आहे ते जनजागृती आणि लोकशिक्षण. अनेक लोक सिग्नलवर थांबत नाहीत, हेल्मेट घालत नाही, मोबाईल कानाला लावून गाडी चालवतात. त्यांना कायद्याची भीती नाही आणि कायद्याबद्दल सन्मानही नाही. समाजाने यात सुधारणा केली तर अपघात नक्कीच कमी होतील. मानवी वर्तन बदलल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. शाळेत जाणाऱ्या मुलांना एनजीओ, विद्यापीठांनी वाहतुकीच्या नियमांचे शिक्षण दिले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – वर्धा – यवतमाळ – नांदेड रेल्वे मार्गाचे युवा दिनी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण? वादाची ठिणगी

लोकांनीच आपल्या सुरक्षेचा निर्णय घ्यावा

वयाच्या साठीनंतर पुन्हा एकदा ड्रायव्हिंग टेस्ट घेण्याचा नियम करता येईल का? असा प्रश्न नाना पाटेकर यांनी केला. त्यावर गडकरी म्हणाले, ६५ वर्षे वयानंतर लोकांनीच स्वतः ठरवायला हवे की आपले वय झाले आहे, आता आपण गाडी चालवणार नाही. काही लोक ८१ व्या वर्षी गाडी चालवतो हे अभिमानाने सांगतात. तर काही लोक वय झाले की स्वतःच गाडी थांबविणे चालवतात. लोकांनी आपल्या सुरक्षेचा निर्णय स्वतःच घ्यावा.

हेही वाचा – मूकबधिर विद्यार्थ्यांना ‘हायटेक’ शिक्षण, राज्यातील पहिला प्रयोग अकोल्यात

जनतेचे सहकार्य आवश्यक

सर्वाधिक अपघात सिग्नल तोडल्यामुळे, रस्ता ओलांडताना, लेन डिसिप्लीन मोडल्याने, ओव्हरटेक करताना होतात. या नियमांचे पालन केले तर बऱ्याच समस्या सुटतील. सतत अपघात होणारे ब्लॅक स्पॉट आम्ही शोधले आहेत. खासदारांचा समावेश असलेली अपघात निवारण समिती स्थापन केली आहे. आम्ही आपल्याकडून सुधारणा करतोच आहे, मात्र जनतेचे सहकार्यदेखील आवश्यक आहे, अशी अपेक्षाही गडकरी यांनी व्यक्त केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What was nitin gadkari answer to nana patekar question about increasing accidents nitin gadkari spoke while attending an event in nagpur cwb 76 ssb