लोकसत्ता टीम

नागपूर : लोकसभेत काँग्रेसच्या जागा वाढल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षच मोठा भाऊ असल्याचे वारंवार सांगत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनिल देशमुख यांनी महाविकास आघाडीत कोणी मोठा आणि लहान नसल्याचे वक्तव्य केले आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी मेहनत घेतली आणि त्याचा फायदा आघाडीला झाला. जे खासदार निवडून आले ते आघाडीचे खासदार आहेत. त्यामुळे कोणत्या पक्षाचे किती खासदार आले आणि त्यामुळे कोण मोठा भाऊ कोण लहान भाऊ हा मुद्दा तकलादू आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

आणखी वाचा-नागपूर मेट्रोचे तिकीट आता व्हॉट्सऍपवर! गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व इतर मित्र पक्षांनी एकत्रितपणे लढविली. सर्वच पक्षांनी केलेल्या एकत्रित मेहनतीने महाराष्ट्रात चमत्कार घडला. महाविकास आघाडीचे नेते एकत्रित बसून लोकसभेप्रमाणेच विधानसभेचे सुध्दा जागा वाटप करतील. आमच्यात कोणीही मोठा किंवा लहान भाऊ नाही.

ते नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे नेहमी छोटाभाऊ मोठाभाऊ यावर बोलत असतात. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वच पक्षांनी एकत्रितपणे चांगला समन्वय ठेऊन काम केले. सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रितपणे बसून उमेदवार निवड करुन उमेदवारी दिली. सर्वच नेत्यांनी महाराष्ट्रात सभा, दौरे करुन महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न केला. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतसुध्दा अशीच परिस्थीत राहणार आहे. सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रित बसून उमेदवार निवडतील आणि त्यांनाच उमेदवारी दिली जाईल. लोकसभेत ज्याप्रमाणे महाराष्ट्रात चमत्कार घडला असाच चमत्कार विधानसभेतसुध्दा घडेल, असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा-नागपूर- आरमोरी महामार्गाच्या रुंदीकरणाला वनखात्याचा विरोध, काय आहेत कारणे?

फडणवीस उपमुख्यमंत्री असणे महाविकास आघाडीला फायद्याचे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पदाचा राजीनामा देणार आहेत. पण भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे फडणवीस यांचा राजीनामा घेऊ नये अशी विनंती केंद्रीय समितीला करणार असल्याचे वृत्त वाचले. फडणवीस यांच्या घाणेरडया राजकारणामुळे राज्यात भाजपची पिछेहाट झाली आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी किंवा बेरोजगारांसाठी काही केले नाही. त्यामुळे त्यांच्याबदल शेतकरी व बेरोजगार युवक-युवतीमध्ये नाराजी आहे. यामुळे फडणवीस हे जर पदावर कायम राहिले तर याचा फायदा हा महाविकास आघाडीलाच होणार असल्याचे अनिल देशमुख यावेळी म्हणाले.