अमरावती : उन्हाळा वाढल्याने हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार वेळेचे नियोजन करावे. वर्ग खोल्या थंड ठेवा, प्रथमोपचार आणि पेयजलाची सोय करा, पोषण आहारात मुलांना सरबत, ताक, ओआरएसचे पाकीट द्या, आदी सूचना महसूल मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व शाळांना केल्या आहेत. मात्र, यासाठी पैसा कोठून आणायचा, असा प्रश्न शाळेच्या मुख्याध्यापकांसमोर आहे.

त्यामुळे नव्या आदेशानुसार गोष्टींसाठी पैसा आणायचा कोठून, हा प्रश्न आहे. उन्हाचा तडाखा लक्षात घेता पूर्वी प्रमाणे एप्रिलच्या सुरुवातीच्या काळात परीक्षा आटोपणे चांगले होते. मात्र, शासनाने पहिली ते नववी पर्यंतच्या परीक्षा पुढे ढकलल्या, या परीक्षा २५ एप्रिलपर्यंत चालणार आहेत. यानंतर पाच दिवसांत पेपर तपासून १ मे रोजी निकालही द्यायचा आहे. हे कसे साध्य होणार आहे, याचा विचार सरकारने केला नाही. आता हा आदेश थोपवून सरकारने शाळांना खर्चात पाडले आहे. शासनाने दिलेले आदेश योग्य असले, तरी या सर्व गोष्टी पुरवण्यासाठी पैसा कोठून आणायचा, हा प्रश्न आहे. साहित्य खरेदीसाठी लहान शाळांना ५००० व मोठ्या शाळांना १२,५०० रुपये शाळा संयुक्त अनुदान मिळते, जे यावर्षी मिळाले नाही.

पोषण आहाराचे किंवा शाळांना साहित्य खरेदीसाठी मिळणारे अनुदान वेळेत मिळत नसताना आता या गोष्टींच्या खरेदीसाठी पैसा कोठून आणायचा, असा सवाल शिक्षक संघटनांकडून विचारला जात आहे. शाळेत मिळणाऱ्या पोषण आहाराचे अनुदान वेळेवर मिळत नाही. या वर्षीचे अनुदान अद्याप शाळांकडे आले नाही. बऱ्याच शाळांमध्ये तांदूळ नव्हते, जे दोन दिवसांपूर्वी देण्यात आले. अनुदान वेळेत न मिळाल्याने हा खर्च शिक्षक, मुख्याध्यापकांना करावा लागतो. एखाद्या शाळेत २५ ते ३० मुले असतील, त्यांना जमेल; पण शंभर, दोनशे, अडीचशे विद्यार्थी असलेल्या शाळांना एवढा खर्च कसा करावा, हा प्रश्न आहे.

हा खर्च करायचा कोठून

अनेक शाळांमध्ये वीज बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. अशा वेळी पंखे, कुलर चालवायचे कसे? बऱ्याच शाळांमध्ये पंखे सुद्धा नाहीत. रोजचे इंधन, भाजीपाला अनुदान चार-चार महिने येत नाही. या वर्षीचे शाळा संयुक्त अनुदान अजूनही मिळालेले नाही. वर्षभर शिक्षकांनाच खर्च करावा लागतो. वरून उन्हाळ्याचा खर्च कुठून करायचा. याची अजूनही स्पष्टता नाही. याकडे लक्ष द्यावे.

राजेश सावरकर, राज्य प्रसिध्दी प्रमुख, प्राथमिक शिक्षक समिती