लोकसत्ता टीम

नागपूर : भारतीय जनता पक्षाला आगामी विधानसभेत मदत करण्यासाठी भाजप-संघ समन्वयक नेमवण्यात येणार आहे. महाराष्ट्रात भाजपला अधिकाधिक जागा मिळाव्या आणि भाजपचा मुख्यमंत्री व्हावी यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्न आहे, असे सांगण्यात येत आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढण्यात येणार आहे. असे भाजपचे नेते सांगत असताना मुख्यमंत्री भाजपचा व्हावा यासाठी संघाने पुढाकार घेतल्याचे यावरून दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला. यास भाजप आणि संघात फारसा चांगला समन्वय नव्हता, असे सांगण्यात येत आहे. आता भाजपने संघाच्या केंद्रीय नेतृत्वाशी संपर्क साधून विधानसभा निवडणुकीसाठी मदत मागितली आहे. विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघात संघ-भाजपमध्ये समन्वय राखण्यासाठी संघ प्रतिनिधींची नियुक्त्या करण्यात येत आहे.

आणखी वाचा-‘लालपरी’ थांबलेलीच… एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच; लाखावर प्रवाशांचे हाल

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने संघाशी फारसा समन्वय न राखल्याने संघ कार्यकर्त्यांनी मदत केली नाही आणि त्याचा फटका राज्यात भाजपला बसला. आता महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत महायुतीची सत्ता यावी, मात्र मुख्यमंत्री भाजपचा असावा, यादृष्टीने संघ-भाजप नेत्यांकडून नियोजन करण्यात येत आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे गोवारी समाजाच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी बुधवारी नागपुरात आले होते. यावेळी त्यांना भाजपचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून संघ सर्व मतदारसंघात समन्वयक नेमणार आहे. याकडे तुम्ही कशा बघता, अशी विचारणा केली असता आंबेडकर यांनी त्यावर मी काय बोलू, असा प्रतिसवाल केला. तसेच प्रत्येकजण आपापली तयारी करतो त्यावर भाष्य करावे, असे मला वाटत नाही, असेही ते म्हणाले.

आणखी वाचा-अतिवृष्टीचे थैमान… बुलढाणा जिल्ह्यात पिकांची अतोनात नासाडी; सुपीक शेती खरडून गेली

आदिवासींना सोबत घेणार

आगामी विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी विदर्भातील आदिवासी संघटनांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याचा प्रयत्न चालवला आहे. ते म्हणाले, सर्वांत मोठी आघाडी आदिवासी समाजाची आहे. यासह वेगवेगळ्या आघाड्या मिळून एक नवीन आघाडी आम्ही उभी करीत आहोत. बहुजन वंचित आघाडी आणि मित्र पक्ष मिळून विधानसभा निवडणुक लढणार आहोत. कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने फोन करून पाठिंबा मागितला होता म्हणून काही ठिकाणी पाठिंबा दिला होता. विधानसभा निवडणुकीत कोणाला पाठिबा देणार नाही. आदिवासी संघटनांशी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बैठक घेण्यात येईल आणि त्यात आघाडीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही आंबेडकर म्हणाले.