नागपूर: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी नागपुरात आले. त्यांनी विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती, मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल ठाकरे यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केले, असे या भेटीचे वर्णन ठाकरे गटाकडून करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फडणवीस यांनी ५ डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून तर नागपुरात येईपर्यंत म्हणजे १४ डिसेंबरपर्यंत ते मुंबईतच होते. त्यावेळी ठाकरे यांनी फडणवीस यांची भेट घेऊन स्वागत का केले नाही? त्यासाठी त्यांना नागपूर हिवाळी अधिवेशनाची वाट का पाहावी लागली? असे अनेक प्रश्न फडणवीस – ठाकरे भेटीच्या निमित्ताने राजकीय वर्तुळात विचारले जात आहेत.

आणखी वाचा-हिंदू देवस्थानाप्रमाणे मशीद, चर्चही सरकारी नियंत्रणात येऊ शकते? आता तर थेट विधानसभा अध्यक्षांनीच…

नागपूरचीच निवड का ?

२३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. महायुतीतीला बहुमत मिळाले. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे स्पष्ट होते. अपेक्षेप्रमाणे फडणवीस यांची नेतेपदी निवड झाली व त्यांनी ५ डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्यावर महाविकास आघाडीचा बहिष्कार घातला होता. शपथविधी झाल्यानंतर १० दिवस फडणवीस मुंबईत होते. पण या काळात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केल्याचे वाचनात नाही. पण असे एकदम असे काय झाले की ठाकरे थेट नागपूरला येऊन फडणवीस यांचे अभिनंदन केले.

नागपूर हे फडणवीस यांचे गृहशहर आहे. संघाचे मुख्यालय नागपूरमध्ये आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलनासाठी दुसरे योग्य ठिकाण होऊ शकत नाही. त्यामुळे ठाकरेंनी फडणवीस यांच्या भेटीसाठी नागपूरची निवड केली असावी, असे सांगितले जाते. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही नेत्यांनी परस्परांवर टीका केली होती. ठाकरेंचे सरकारच फडणवीस यांनी पाडल्याने दोन्ही नेत्यांमध्ये कमालीची दुरी निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी फडणवीस यांची नागपुरात घेतली भेट राजकीयदृष्ट्या महत्वाची आहे. भाजपची ऑफर आहे असे सांगून पक्षाला ब्लॅकमेल करणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्यांना या भेटीमुळे चाप बसला आहे.

आणखी वाचा-अपंग बांधवांचा विधान भवनाच्या द्वारावर थांबा; दुचाकीसह…

दुसरीकडे शिवसेना नेते व माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते फडणवीस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असे जाहीरपणे सांगत असले तरी ते नाराज असल्याचे निवडणूक निकालानंतर भाजप नेत्यांना त्यांची मनधरणी करण्यासाठी जावे लागले यातून दिसून आले. शिंदेंनाही फडणवीस – ठाकरे भेटीमुळे सूचक इशारा मिळाला आहे. हे नेते पुन्हा एक होऊ शकतात हा संदेश यातून गेला आहे.

तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची बार्गेनिंग पॉवर कमी होणार आहे. ठाकरेंकडे ९ खासदार आहे. केंद्रात भाजपला एका एका खासदाराची गरज आहे. तसेच राष्ट्रवादीला विशेषत: अजित पवार यांना सोबत घेण्यास संघ आणि खुद्द भाजपमधील एक गट नाखूष आहे. ठाकरेंचा काँग्रेससोबतचा वाढता दुरावा आणि त्याच वेळी त्यांनी फडणवीस यांची घेतलेली भेट महत्वपूर्ण आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did uddhav thackeray choose nagpur to meet devendra fadnavis cwb 76 mrj