गडचिरोली: गेल्या तीन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या रानटी हत्तींनी २९ सप्टेंबररोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास प्रथमच गडचिरोली शहराच्या सीमेत प्रवेश केल्याने वनविभागाची चांगली तारांबळ उडाली .दुपारी मसेली परिसरात तर सायंकाळी वाकडी व सेमाना देवस्थानच्या मध्यभागातील जंगलात कळपाचा वावर होता. यामुळे वन विभाग व हुल्ला टीमला चामोर्शी मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी काही काळ रोखावी लागली.मागील आठ दिवसांपासून रानटी हत्तींचा कळप पोर्ला वनपरिक्षेत्रातील चुरचुरा उपक्षेत्रात वावरत होता. या भागातील नवरगाव, कोडना, साखरा, गोगाव, महादवाडी, कुन्हाडी आदी भागातील शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली.त्यानंतर गोगावलगतच्या नागोबा देवस्थान परिसराच्या शेतशिवारात शनिवारी पीक पायदळी तुडविले. त्यानंतर रात्रीच्या सुमारास कळपाने खरपुंडी गावाजवळची कठाणी नदी ओलांडून सालईटोला गावाच्या बाजूने माडेतुकूम परिसरातून गडचिरोली- धानोरा मार्ग ओलांडला. टेकडीवरील हनुमान मंदिर परिसरातून हा कळप पोटेगाव मार्गाच्या बाजूने मसली गावाच्या दिशेने गेला. रविवारी दुपारपर्यंत याच भागात हा कळपाचा वावरहोता. त्यानंतर सायंकाळी सेमाना उद्यान ते वाकडी फाट्याच्या मधोमध असलेल्या जंगलातून हत्तींनी चामोर्शी मार्ग ओलांडला. त्यांचा रोख मुडझा गावाच्या दिशेने होता. हत्तींचा वावर पाहून वन विभागाच्या पथकाने वाहतूक बंद केली. यावेळी नागरिकांना ध्वनिक्षेपकावर माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>Nitin Gadkari : “अनुदानाच्या पैशांची शाश्वती नाही, कारण लाडकी बहीण योजना…”, नितीन गडकरींच्या विधानाची चर्चा

कळपात नवीन पाहुणे

काही वर्षांपूर्वी छत्तीसगडहून गडचिरोली दाखल झालेल्या या रानटी हत्तींच्या कळपामध्ये २३ हत्ती होते. मधल्या काळात यातील दोन हत्तींचा मृत्यू झाला. यादरम्यान कळपात जवळपास आठ नव्या पाहुण्यांचे आगमन झाले. त्यामुळे हत्तींची संख्या २८ ते २९ असल्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. या हत्तींना खायला मोह आणि कोवळे धान आवडत असल्याने या काळात ते अधिक प्रवास करतात. यामुळे मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान होत आहे. वन विभागाने मुडझा आणि गडचिरोली शहरालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

 दहशतीचे वातावरण

रानटी हत्तींचा वावर गत तीन वर्षांपासून आहे. ऐन पीक हंगामातच कळपाची एन्ट्री होते व पिकांची नासधूस करून ते

परत जातात. दहा हजार रुपये किमतीच्या पीक नुकसानीची भरपाई हजार रुपयात मिळत असल्याने शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई पुरेशी नाही. वन विभागाने शेतकऱ्यांना भरपाई देण्यापेक्षा त्या हत्तींचा बंदोबस्त करणे गरजचे आहे. अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wild elephants in gadchiroli border gadchiroli news ssp 89 amy