एका विवाहितेने तिच्या दोन चिमुकल्या मुलींसह वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, शनिवारी सकाळी उघडकीस आली. दिपाली शितल खंगार (२७ ) असे या महिलेचे तर देवांशी (साडेतीन वर्ष) व वेदांशी (दीड वर्षे) असे मृत मायलेकिंची नावे आहेत. भंडारा तालुक्यात वैनगंगा नदी काठावरील तिड्डी या गावातील ही घटना आहे.

हेही वाचा >>> राजकीय नेत्यांचा महापालिकेच्या पथकावर दबाव ; नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईत अडथळे

शुक्रवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास महिलेने चिमुकल्या मुलींसह वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी सकाळी दहा वाजता तरंगणारे तीनही मृतदेह नागरिकांना दिसताच याची माहिती कारधा पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक थोरात व तहसीलदार अरविंद हिंगे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे मात्र आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.