भंडारा : नोंदणीकृत कामगारांना शासनातर्फे सुरक्षा व आवश्यक साहित्याची किट असलेली पेटी वाटप केली जात आहे. तब्बल आठ दिवसांपासून प्रतीक्षा करूनही किट न मिळाल्याने आज सकाळी संयम सुटलेल्या महिला कामगारांनी बेला येथे भंडारा- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने कामगार शांत झाले.
महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने कामगारांना सुरक्षा साहित्य असलेल्या किटचे वाटप केले जात आहे.किटवाटपाचे काम एका खासगी कंपनीला आहे. बेला येथील एका लॉनमध्ये हे वाटप होणार होते. मागील आठ दिवसांपासून कामगारांना पेटी वाटपसाठी तारीख दिली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातून लांबून लांबून कामगार पेटी साठी येथे येतात. मात्र प्रत्येक वेळी आज नाही उद्या मिळणार असे सांगून त्यांना परत पाठवले जाते. त्यामुळे या कामगारांचा वेळ आणि ये जा करण्याचे पैसेच वाया जात नाही आहेत तर त्यांची रोजी देखील बुडत आहे. अनेक कामगार रोजी बुडवून येत आहेत त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
दरम्यान, या कामगारांना १७ तारखेला पेटी वाटप होईल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे रात्रीपासूनच अनेक कामगारांनी बेला येथील या लॉनपुढे तळ ठोकला. लाखांदूर पालांदुर ही गावे दूर पडत असल्याने रात्रीच कामगार या ठिकाणी मुक्कामी आले. मात्र सकाळी १० वाजता त्यांना आज पेटी वाटप होणार नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे कामगारांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी आक्रमक भूमिका घेतील. शेकडो संतप्त महिला राष्ट्रीय महामार्गावर येऊन बसल्या आणि घोषणाबाजी करू लागल्या. आठ दिवसांपासून नोंदणीकृत बांधकाम कामगार किट मिळवण्यासाठी उन्हात तन्हात ताटकळत उभे राहत आहेत. दिवसभर वाट पाहून कामगारांना पेटीविना आल्या पावली परतावे लागत असल्याने येथील कामगार संतप्त झाले. जिल्ह्यातील हजारो पेटीसाठी कामगारांनी नोंदणी केली आहे.
महिला-पूरुष कामगार पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत पेटीसाठी ताटकळत उभे राहतात तर काहींनी रस्त्याच्या कडेला बसून रात्र जागून काढल्याची माहिती पुढे आली आहे. काही महिला त्यांच्या लहान मुलांना घेऊन दोन दिवस या ठिकाणी मुक्कामी होत्या. त्यामुळे येथे शेकडो महिला-पुरुष कामगारांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असून कामगारांची गैरसोय होत आहे.