लोकसत्ता टीम

अकोला : पर्यावरण प्रदूषणासाठी पातळ प्लास्टिक पिशवी कारणीभूत ठरते. बंदी असतानाही पातळ प्लास्टिक पिशवीचा सर्रास वापर केला जातो. पर्यावरणासाठी ते अत्यंत घातक ठरत असल्याने प्लास्टिक पिशवी मुक्तीसाठी अकोल्यातील एका डॉक्टर दाम्पत्याची १३ वर्षांपासून धडपड सुरू आहे. वर्षभरापासून त्याला अधिक व्यापक स्वरूप देऊन प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्या नागरिकांना त्यांनी साडेतीन हजारावर कापडी पिशव्यांचे वाटप केले. प्लास्टिक पिशवी मुक्तीसाठी त्यांनी नागरिकांना गळ घालून जनजागृती मोहीम राबवली आहे. त्यांचा हा विशेष उपक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

वाढते तापमान, प्रदूषण, अवर्षण, प्लास्टिकचा अतिवापर आदींमुळे पर्यावरणात प्रदूषण निर्माण होऊन मानव जीवन धोक्यात आले आहे. यावर शहरातील वृंदावन नगरातील डॉ. मनीषा पालीवाल व डॉ. योगेश पालीवाल हे दाम्पत्य एक आगळावेगळा उपक्रम राबवत आहेत. भाजी, फळे घ्यायची असल्यास विक्रेत्याला प्लास्टिक पिशवी मागू नका, तर आमच्याकडून मोफत कापडी पिशवी घेऊन जावी, अशा आग्रहाचे फलकच त्यांनी चक्क आपल्या घरासमोर ठेवले आहेत. त्या फलकासोबत २० ते ३० कापडी पिशव्या ते ठेवत असतात. बाजारात खरेदी करायला जाताना कापडी पिशवी सोबत ठेवावी, पिशवी आणायला विसरलात तर आमच्याकडून मोफत कापडी पिशवी घ्या, अशी विनंती करून ते नागरिकांची समजूत घालतात. २०११ पासून ते हा उपक्रम राबवत आहेत. अपेक्षित बदल दिसून येत नसल्याने त्यांनी गेल्या १५ ऑगस्टपासून घरासमोर फलक लावून दररोज कापडी पिशव्यांचे वाटप सुरू केले. आतापर्यंत सुमारे साडेतीन हजारावर पिशव्यांचे त्यांनी मोफत वाटप केल्याचे सांगितले.

आणखी वाचा-Video : ताडोबाची सम्राज्ञी ‘कुवानी’च्या बछड्यांनी लुटला पहिल्या पावसातील हिरवळीचा आनंद

कृषी विद्यापीठ परिसरामध्ये फिरायला येणारे नागरिक परत जाताना भाजी, फळे व इतर किरकोळ वस्तू विकत घेऊन जातात. हा नागरिकांचा नित्यक्रम असतो. डॉ. पालीवाल दाम्पत्याच्या प्रयत्नाने त्या परिसरातील ३० ते ३५ टक्के नागरिकांना प्लॉस्टिक पिशवी वापरणे बंद केल्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. डॉ. पालीवाल दाम्पत्याने सुरुवातीला स्वतः घरच्या जुन्या साड्या, बेडशीट, परदे आदींपासून पिशव्या शिवतात. त्यांचे हे प्रयत्न पाहून समाजातूनही मदतीचे हात पुढे आले. डॉ. पालीवाल यांच्या निवासस्थानामुळे जनजागृतीचे फलक सकाळी ६ ते रात्रीचे १० पर्यंत कापडी पिशव्यांसह ठेवलेले असतात. सोबत त्यांनी जठारपेठ, गांधी रोड, जनता बाजार आदी परिसरात नागरिकांमध्ये जनजागृती करून कापडी पिशव्यांचे वाटप केले. सोबतच ‘प्लास्टिक पिशवीची सवय सोडा, जीवनाशी नाते जोडा’ अशा आशयाचे ६५ फलक त्यांनी भाजी व फळ विक्रेत्यांना वाटले. डॉक्टर पालीवाल दाम्पत्य प्लास्टिक पिशवी मुक्तीसाठी राबवत असलेली विशेष मोहीम समाजात दिशादर्शक ठरत आहे.

आणखी वाचा-चंद्रपूर : विधानसभेची एक जागा द्या, अन्यथा सामूहिक राजीनामे; ‘या’ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा

मुलांना पर्यावरण व वृक्ष संस्कार

वृक्षारोपण व त्याच्या संवर्धनासाठी देखील पालीवाल दाम्पत्य सरसावले आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या निवासस्थानापुढे बियाणे बँक सुरू केली. दरवर्षी ते हजारो रोपे तयार करतात. वृक्षारोपण व संवर्धनासाठी इतरांना प्रोत्साहित करतात. डॉ. मनीषा पालीवाल संक्रांतीला पर्यावरणपूरक हळदी कुंकूमध्ये कुंडीत जगवलेली रोप व कापडी पिशव्यांचे वान म्हणून वाटप करतात. आपल्या मुलांना पर्यावरण व वृक्ष संस्कार द्यावे, असे आवाहन पालीवाल दाम्पत्याने केले.