यवतमाळ : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रेतीच्या ट्रकला भरधाव कारने जोरदार धडक दिली. या अपघतात चार जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज सोमवारी पहाटे ५ वाजताच्या दरम्यान कळंब – यवतमाळ मार्गावर चापर्डा आणि घोटी गावाच्या दरम्यान झाला.

चापर्डा गावाजवळ रेतीने भरलेला ट्रक ( क्र. एम.एच.३२- ए.जे.७७७३) यवतमाळच्या दिशेने रस्त्याच्या कडेला उभा होता. या ट्रकमध्ये कन्हान येथून आणलेली रेती नेली जात होती. दरम्यान, नागपूरवरुन यवतमाळकडे येणाऱ्या इनोव्हा कारने (क्र.पी.बी. ११-सी.बी.-४९६३) रेतीच्या उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या गाडीमध्ये एकूण पाच जण प्रवास करीत होते. या अपघातात चालकासह चार जण जागीच ठार झाले. यामध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. तर एक जण गंभीर जखमी असून त्याला तातडीने कळंब ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने यवतमाळ येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले.

हेही वाचा – विश्वचषक जिंकणाऱ्या भारताच्या संघाला सेवाग्रामच्या डॉक्टरांचे योगदान, जाणून घ्या सविस्तर

अपघात इतका भीषण होता की, इनोव्हा गाडी ट्रकच्या मागच्या भागात जाऊन अडकून पडली. सुरक्षेच्या दृष्टीने लावलेल्या एअर बॅग्सच्यासुद्धा चिंधड्या झाल्या. अपघाताची माहिती मिळताच कळंब पोलीस ठाण्याच्या निरीक्षक दीपमाला भेंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मदतीसाठी गावकरी पुढे सरसावले. सर्व मृतक पंजाब राज्यातील असल्याची माहीती आहे. अजुनपर्यंत कोणाचीही ओळख पटलेली नव्हती. पोलिसांकडून नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सर्व जण पंजाबमधून नांदेड येथे गुरुद्वारात दर्शनासाठी निघाले होते. रात्रभर सतत प्रवास केल्याने चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस सहकारी घटनास्थळी पोहोचले आणि तत्काळ मदतकार्य सुरु केले. हे भाविक पंजाबमधून आले आहेत. ट्रक आणि इनोव्हा कार या एकाच दिशेने यवतमाळकडे चालल्या होत्या. मात्र ट्रक उभा असताना इनोव्हा कारने ट्रकला मागून धडक दिली. रात्रभर प्रवास केल्याने ड्रायव्हरला झोपेची डुलकी आली असण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनीसुद्धा अपघातस्थळी धाव घेतली.

हेही वाचा – निविदा मंजुरीसाठी भ्रष्टाचाराला खतपाणी! पूर्व प्रशिक्षण देणाऱ्या संस्था निवडीसाठी मागितली लाच

यवतमाळ जिल्ह्यात रेती वाहतूक करणारे ट्रक रात्रभर रस्त्यावर धावतात. बहुतांश ट्रकमधून अवैध रेती वाहतूक होते. अनेकवेळा या वाहतुकीमुळे अपघात घडत आहेत. या वाहतुकीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने अशा घटना घडत आहेत.