यवतमाळ : शासन आपल्या दारी सारख्या उपक्रमामुळे शासनाच्या विविध योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचवल्या. पण यवतमाळ जिल्हा प्रशासनाने त्याही पुढे जाऊन ‘शासन आपल्या मोबाईलवर’ हा उपक्रम सुरू करून अनेक शासकीय योजना, उपक्रम, प्रमाणपत्र थेट जनतेच्या हातात एका क्लिकवर आणले आहेत. जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन सुरू केलेला हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे.
जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या मोबाईलवर’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाचे आज शुक्रवारी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते लोकार्पण झाले. भविष्यात हा उपक्रम संपूर्ण राज्यात सुरू करणार असल्याची पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी दिली.
या उपक्रमांतर्गत प्रशासनाच्या वतीने अधिकृत यु-ट्यूब चॅनल तयार करण्यात आले आहे. या चॅनेलवर महसूल विभागातील जमिनीची नोंदणी, फेरफार नोंदी, अकृषक परवानगी, विविध दाखले, वनहक्क कायदा, रस्ते संबंधी वाद, शिधापत्रिका, जमीन प्रकार, सातबारा, वारस नोंदी, भूसंपादन प्रक्रिया, मतदार नोंदणी प्रक्रिया, कलम १५५ दुरुस्ती पद्धत, अतिक्रमण नियमित करणे, नैसर्गिक आपत्ती, जन्म मृत्यूची उशिरा नोंदणी, शेती घेताना घ्यावयाची दक्षता, सहधारकांमध्ये हिस्से वाटप, अर्धन्यायिक प्रक्रिया, सामाजिक अर्थसहाय्य योजना, पोटखराब जमीन वापरात आणणे, गौणखनिज संदर्भात माहिती, अदिवासी जमिनींचे व्यवहार अशा विविध विषयांची माहिती चॅनेलच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.
पुढील टप्प्यात विविध शासकीय विभागाच्या योजना देखील उपलब्ध होणार आहे. संबंधित विषयाची सविस्तर माहिती उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी स्वत: व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. विषय समजून सांगतांना त्याचे बारकावे, नियम, अटी, दक्षता, काळजी यावर देखील माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे घरबसल्या महसूलसह विविध विभागांच्या किचकट प्रक्रिया देखील नागरिकांना सोप्या भाषेत अधिकाऱ्यांकडून माहिती होतील.
जिल्हाधिकाऱ्यांनी अगदी काही दिवसात हा उपक्रम सुरु केला. जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक सेवा, पारदर्शक आणि गतिमानपणे मिळण्यासोबतच त्यांचा पैसा, वेळ आणि परिश्रम वाचविण्यासाठी हा नाविण्यपूर्ण उपक्रम उपयोगी पडणार आहे. हा उपक्रम अतिशय चांगला असून सोप्या भाषेत नागरिकांना विविध योजना, उपक्रम आत्मसात होईल, असे पालकमंत्री राठोड यावेळी म्हणाले. प्रशासन गतिमान व लोकाभिमुख होण्यासोबतच या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिक व प्रशासनामध्ये सुसंवाद वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, तहसिलदार आदित्य शेंडे आदी उपस्थित होते.