यवतमाळ : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळविले. त्यामुळे राज्यात येत्या विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या तिन्ही पक्षांनी एकजुटीने काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने आपण यवतमाळ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असून तयारी सुरू केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे नेते तथा येथील विधान परिषदेचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी दिली.

आज गुरुवारी येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत सामंजस्याने निर्णय होईल. ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येण्याची क्षमता आहे, त्याला उमेदवारी मिळावी, असे महाविकास आघाडीचे धोरण राहील, असे बाजोरिया म्हणाले. जिल्ह्यातील यवतमाळ, पुसद आणि उमरखेड विधानसभा मतदारसंघांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यवतमाळातून आपण स्वत: निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. यवतमाळचे भाजपचे विद्यमान आमदार मदन येरावार यांना कोणत्याही परिस्थितीत यावेळी विधानसभेत निवडून जावू देणार नाही, अशी शपथ आपण घेतली आहे. यवतमाळ शहरासह जिल्ह्याची वाट लावणाऱ्या येरावार यांच्यासारख्या लोकप्रिनिधीस पराभूत करण्यासाठी नागरिकांनी साथ द्यावी, असेही बाजोरिया म्हणाले. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीची गरज नसल्याचे सांगितल्याने आपण लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारास पाठिंबा दिला होता. मात्र शेवटच्या क्षणी महाविकास आघाडीचेच काम केले. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी लक्षणीय मते घेतली. आजी-माजी पालकमंत्र्यांवरील नागरिकांच्या नाराजीमुळेच राजश्री पाटील पराभूत झाल्या. मदन येरावार ज्या लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक होते, त्या प्रत्येक मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला, असा आरोप बाजोरिया यांनी केला.

हेही वाचा : पराभवासाठी शेतकऱ्यांचा रोष कारणीभूत….भाजप नेते म्हणतात, आम्ही चिंतन….

येरावार नव्हे, टक्केवार!

आजी-माजी पालकमंत्र्यांच्या कमिशनखोरीमुळे जिल्ह्याचे वाटोळे झाले, अशी बोचरी टीका बाजोरिया यांनी केली. प्रत्येक कामात आमदार टक्केवारी मागत असल्याने अमृत योजनेत सुमार दर्जाची कामे झाली. त्यामुळे यवतमाळकरांना अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आमदार येरावार नसून टक्केवार आहेत, अशी बोचरी टीका करतानाच आमदार येरावार हे गावगुंडांसाठीच काम करत असल्याचा आरोपही बाजोरिया यांनी केला. आपण केलेले आरोप खोटे असल्यास आपल्यावर खटला दाखल करावा किंवा ज्यांच्यावर आरोप केले त्यांची नार्को टेस्ट करावी, असे आव्हानही बाजोरिया यांनी दिले.