लोकसत्ता टीम

नागपूर : रुग्णाला उपचारादरम्यान विज्ञानासोबतच शास्त्रसंमत मंत्रसाधना, योगित उपचार पद्धतीची जोड दिल्यास असाध्य आजारही बरे होऊ शकतात, असा दावा अंतर योग या आध्यात्मिक संस्थेचे संस्थापक आचार्य उपेंद्र यांनी केला. मंत्र साधना, अंतर योगातून मधुमेह, गुडघादुखीसह इतरही आजारांवरील उपचाराबाबत त्यांनी बरेच काही सांगितले.

नागपुरातील वनामती येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नागपुरातील रॉयल पराते सभागृह, खामला येथे अंतर योग या फोर्ट मुंबईतील आध्यात्मिक संस्थेतर्फे १९ आणि २० ऑक्टोंबरला दोन दिवसीय सायन्स ऑफ हिलींग हे शिबीर घेण्यात आले. त्याची माहिती देतांना आचार्य उपेंद्र पुढे म्हणाले की, भारताला बलशाली, निरोगी, चारित्रसंपन्न राष्ट्र बनविण्याच्या उद्देशाने सायन्स ऑफ हिलींग शिबीराची आखणी केली गेली.

आणखी वाचा-अवैध औषधविक्री करणाऱ्या मुंबईतील डॉक्टरला भंडाऱ्यात अटक

शिबीरात रुग्णाच्या आजाराचे मुळ असलेल्या खोलवर रुजलेल्या संस्कारांना शक्तीशाली साधनेने मुळातून शुद्ध केले जाते. त्यामुळे रुग्णातील रोगनिवारण शक्ती जागृत होते. केवळ विज्ञान रुग्णाला शंभर टक्के स्वास्थपूर्ण जिवन देऊ शकत नाही. तर विज्ञानाला तत्वज्ञान आणि योगसाधनेची जोड देणे नितांत आवश्यक आहे. नागपुरातील शिबीराच्या पहिल्या दिवशी ॲलोपाॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद डॉक्टरांच्या उपस्थितीत सहभागी होणाऱ्यांचा त्रास व त्यांची विविध तपासणी केली गेली. शिबीरानंतरही या सगळ्यांची पून्हा तपासणी केली गेली. त्यातून बहुतांश रुग्णांना लाभ झाल्याचे उघडकीस आल्याचा दावाही आचार्य उपेंद्र यांनी केला. मुंबई, पनवेल, नाशिक, नागपूर अशा प्रत्येक ठिकाणी मिळालेल्या शिबीराच्या चांगल्या प्रतिसादानंतर संपूर्ण देशात आरोग्य क्रांती घडविण्यासाठी अंतर योग आता ठाणे (९ ते १० नोव्हेंबर) व इतर ५० ठिकाणी सायन्स ऑफ हिलिंग हे शिबीर घेणार असल्याचेही आचार्य उपेंद्र यांनी सांगितले.

आणखी वाचा-एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचे निमंत्रण, तर दुसरीकडे मेळाव्याचे आयोजन; आमदार केचे काय करणार?

रुग्णाच्या आजारात या बदलांचा दावा

कल्पना गोल्हर यांना चिकगुनिया झाल्यापासून गुडघेदुखी मागे लागली. मागील महिन्याभरापासून त्या वेदनशमन औषधांसह स्टिराॅईडच्या औषधी घेत होत्या. परंतु फारला लाभ नव्हता. त्यांना गुडघेदुखी असह्य झाली होती. स्नेहा चिंतावार या गृहिनीलाही गुडघादुखीमुळे खाली बसता येत नव्हते. शिबीरात सहभागी झाल्यावर त्यांना खूप आराम झाला. आता दोघेही सामान्याप्रमाणे जगतात. स्वराली मेश्राम यांना दहावीपर्यंत व्यवस्थीत लिहता येत नव्हते. तिला विल्सन रोग होता. मागील ३ वर्षांपासून त्यांना स्पष्ट बोलताही येत नव्हते. पण शिबीरानंतर त्यांच्या बोलण्यात सुधारणा झाली. आता ती चित्रही काढू शकत असल्याचेही आचार्य उपेंद्र म्हणाले.

आध्यात्मिक शक्तीने रोग निवारण शक्ती जागृत

मी काही जादूगार नसून अंतर योग हे रुग्णालय नाही. मी अध्यात्मिक शक्तीने, तुमच्यातील रोग निवारण शक्ती जागृत करून, तुम्हाला देशकार्यासाठी प्रेरित करायला आलो आहे, असे मत आचार्य उपेंद्र यांनी शिबीरात उपस्थितांना केले.