चंद्रपूर : मूल तालुक्यातील चितेगाव येथे शनिवारी सकाळी शेषराज पांडुरंग नागोशे (३८) या युवा शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला असता त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दोन दिवसात वाघाच्या हल्ल्यातील हा दुसरा बळी असून या वर्षात चार महिन्यात नऊ जणांचा बळी घेतला आहे.
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शेषराज हे त्यांच्या शेतातील भाजीपाला पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. उमा नदीच्या परिसरात असलेल्या त्यांच्या शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर अचानक हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आलीं त्यानंतर वन पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. या घटनेमुळे गावात भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.