नाशिक – आदिवासी जात प्रमाणपत्रासाठी अटी-शर्ती त्वरीत शिथील करण्यात यावी, आदिवासी कुटूंबाना अंत्योदय योजनेत समाविष्ठ करण्यात यावे, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ग्रामीण भागामधील अनेक आदिवासी कुटूंबाकडे जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेली शासकीय कागदपत्रे नसतात. जुन्या नोंदी एकतर सापडत नाहीत. कुटूंबात जन्माच्या नोंदी नाहीत. शिक्षण नसल्याने इतर कागदपत्रे भेटत नाही. साहजिकच अनेक आदिवासी कुटूंबे जात प्रमाणपत्रापासून वंचित आहेत. यामुळे शिक्षण, नोकरी आणि शासकीय योजनांपासून अनेक आदिवासी बांधव दूर आहेत. गरजु लाभार्थ्यांना स्वत:चे हमीपत्र, प्रतिज्ञापत्राआधारे त्वरीत जातीचे दाखले वितरित करावेत, ही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सद्यस्थितीत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा आणि निवासी वसतिगृह सुरू करण्यात यावेत, ग्रामीण भागात अनेक आदिवासी बांधवाकडे स्वत:ची हक्काची जागा नसल्याने तसेच स्वत:चे घर नसल्याने संबंधिताना शासकीय जागा देत घरकुल त्वरीत मंजूर करावे, भूमिहीन आदिवासी शेतकऱ्यांना उपजिविकेसाठी शासनाने जमीन उपलब्ध करून द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, मोर्चा काढण्यापूर्वी ईदगाह मैदानावर सभा झाली. या सभेत दत्तु बोडके, जगन काकडे, शाम गोसावी, दत्ता आरोटे आदींनी मार्गदर्शन केले. या मोर्चामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली.