नंदुरबार – राजकीय शालजोडे बाहेर काढून नंदुरबार जिल्हा विकास मंचच्या (नंदुरबार डिस्ट्रीक्ट डेव्हलपमेंट फोरम) मुहुर्तमेढसाठी व्यासपीठावर आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हा विकासाचा सूर आवळतांनाच जिल्ह्यातील सत्तेचा केंद्रबिंदु असलेले आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित परिवारास लक्ष्य केले. एकच परिवार जिल्ह्याचा विकास करत असल्याचा आभास निर्माण करणाऱ्यांविरोधात काम करण्यासह थेट गावित परिवाराविरोधात रणशिंग फुंकण्याचे काम या व्यासपीठावरुन झाले आहे. लोकसभा निवडणूक जवळ आली असताना ही घडामोड झाल्याने गावित परिवाराच्या अडचणी वाढल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मितीस २५ वर्षे झाले असले तरी अनेक प्रश्न अजूनही जसेच्या तसे आहेत. हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी नंदुरबार जिल्हा विकास मंचची मुहुर्तमेढ रोवली. सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी या मंचमध्ये एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. जिल्ह्याच्या विकासाचा एकाच परिवारावर किती बोजा टाकणार, असा उपरोधात्मक टोला शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी हाणला. मंच स्थापनेपासूनच यातील निमंत्रक आणि उपस्थितांच्या यादीत डॉ. विजयकुमार गावित यांचे कुटुंबीय वगळता जिल्ह्यातील सर्वच पक्षीय नेत्यांचा मंचमध्ये सहभाग आहे.

मंचच्या व्यासपीठावरुन डॉ. विजयकुमार यांचे बंधू भाजपचे नेते राजेंद्र गावित यांनीही डॉ. विजयकुमार यांना घरचा आहेर दिला. निवडणुका लागल्या की, आम्ही गाई घ्या, म्हशी घ्या, बकरे घ्या, म्हणत फिरतो. आम्ही जिथे होतो, तिथेच आहोत, असे त्यांनी सांगितले. आपली पुतणी डॉ. हिना गावित यांनाही त्यांनी फटकारले. त्यांच्या उच्च शिक्षणाचा काय फायदा, असा प्रश्न त्यांनी केला. माजी खासदार माणिकराव गावित असते तर त्यांनीही उज्वलाच्या शेगड्या वाटल्या असत्या, असा टोला हाणला. भाजप आमदार राजेश पाडवी यांनी विकासात्मक कामात कशा पद्धतीने अडथळे आणले जात आहेत, याचे दाखले देत विकासाचा निधी एकाच मतदारसंघात कसा वळवला जातो, बाकीच्यांची उपेक्षा कशी होते, हे मांडले. आपलेच दात आणि आपलेच ओठ, असे म्हणत आतापर्यंत एकटा लढत होतो, आता मंचची मदत होईल, असे भाष्य केले.

यावेळी माजी मंत्री पदमाकर वळवी यांनी राजकारणामुळे समाजाचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. नवापूरचे आमदार शिरीष नाईक यांनी सत्ताधाऱ्यांना निधी तरी मिळतो, आम्हाला काहीच मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. यावेळी माजी आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी डॉ. गावित यांना राजकीय जन्म आपणच दिल्याचे सांगून ती आपली चुक झाल्याची कबुली दिली. यावेळी प्रमुख पाहुणे असलेले माजी मंत्री तथा भाजपचे आमदार जयकुमार रावल पक्ष बैठकीमुळे उपस्थित राहू न शकल्याने त्यांचा संदेश ऐकविण्यात आला.

जिल्ह्यातील शिंदे गटाचे सर्वेसर्वा चंद्रकांत रघुवंशी यांनी तर, भाजपच्या विद्यमान खासदारांऐवजी आमदार राजेश पाडवी यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी केली. आदिवासी विकास विभागाच्या दुभती जनावरे वाटप योजनेवरुन त्यांनी डॉ. गावितांवर टीका केली. ही योजना म्हणजे भ्रष्ट्राचाराचे कुरण असून या योजनेत दिलेली जनावर चारच दिवसात कशी दगावतात, असा प्रश्न केला. आगामी काळात राजकीय नेत्यांनी एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा विकासात्मक कामासाठी एकत्र आल्यास पाचच वर्षात जिल्ह्याची परिस्थिती बदलण्याची अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला अभिजित पाटील, शिवेसना जिल्हाप्रमुख राम रघुवंशी, किरसिंग वसावे, माजी आमदार कुवरसिंग वळवी, भाजपचे नागेश पाडवी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके, साक्रीचे माजी नगराध्यक्ष नाना नागरे आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All parties united against vijayakumar gavit family in nandurbar district pbs