लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : अंबड आणि सातपूर येथील प्रकल्पग्रस्तांना औद्योगिक वसाहतीत भूखंड देण्यासह इतर मागण्या पूर्ण कराव्यात तसेच अंबड गावाचा ठराव नसतानाही अंबड येथील गायरान जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला देण्याचा निर्णय मागे घेण्यात न आल्याने प्रकल्पग्रस्त आंदोलनावर ठाम आहेत. शुक्रवारी सकाळी आठ वाजता अंबड येथील मारुती मंदिरापासून महसूल मंत्र्यांच्या लोणी येथील निवासस्थानापर्यंत २०० प्रकल्पग्रस्त शेतकरी अर्धनग्न पायी मोर्चा काढणार आहेत. मंत्र्यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती अंबड प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी दिली.

दातीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गायरान जमीन ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला अंबड ग्रामस्थांच्या ठरावाशिवाय देण्यात आली. जमीन देण्यास ग्रामस्थांचा सक्त विरोध असून यापूर्वीही १९७३ मध्ये महामंडळाला याच गावची जमीन देण्यात आली आहे. महामंडळाविरोधात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. १९७३ आणि १९७४ मध्ये शासनाने आणि महामंडळाने जमिनी घेतेवेळी शेतकऱ्यांना दिलेल्या कोणत्याही आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. उलट अनेक समस्यांचा डोंगर उभा करून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना देशोधडीला लावले. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वेठीस धरून औद्योगिक वसाहतीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना त्रस्त केले आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी हे आंदोलन होत असल्याचे दातीर यांनी नमूद केले.

आणखी वाचा-नाशिक : महिनाभराच्या उपचारानंतर क्षत्रबालकचा गगन विहार

लोणीपर्यंत तीन दिवसात पोहचणार

अंबड ते लोणी हे अंतर ९५ किलोमीटर आहे . ३० ऑगस्ट रोजी सकाळी अर्धनग्न पायी मोर्चाला सुरुवात होणार आहे. एक सप्टेंबर रोजी आंदोलनकर्ते लोणी येथे महसूलमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचतील, यादृष्टीने पायी मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.