Amit Shah Convoy in Nashik: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच इंडिया टुडे वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आम्ही रस्त्यांची कामं करत असल्याचं म्हटलं होतं. “स्वतः मुख्यमंत्री रस्त्यावर उतरून कामं पाहतो. यावर्षी कुठं पाणी साचलेलं तुम्ही पाहिलं का? मला फिल्डवर उतरून काम करायला लाज वाटत नाही”, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. मात्र त्याचदरम्यान रस्त्यावर पाणी साचल्यामुळं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ताफ्याने आपली वाट बदलल्याचं समोर आलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी एक व्हिडीओ शेअर करत महायुती सरकारवर टीका केली.

अतुल लोंढे काय म्हणाले?

अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान नाशिक येथे जात असताना त्यांच्या ताफ्याने रस्त्यावर पाणी साचल्याचे पाहून वाट वाकडी केली होती. यावेळी एका वृत्तवाहिनीचा व्हिडीओ एक्सवर पोस्ट करत अतुल लोंढे यांनी सरकारवर खोचक टीका केली. ते म्हणाले, “अमित शाह यांना नितीन गडकरी आणि एकनाथ शिंदे यांच्या विकासावर विश्वास नाही का? शाह यांचा ताफा रस्त्याच्या कडेने निघून गेला. रस्त्याच्या मधून गेले असते तर त्यांना कदाचित विकास दिसला असता.”

हे वाचा >> Sanjay Raut 15 Days Jail : संजय राऊत दोषी, १५ दिवसांची शिक्षा; मेधा सोमय्या यांचे मानहानी प्रकरण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नाशिकमधील भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन, मतभेद विसरून काम करावं, असं आवाहन त्यांनी केलं. नाशिक येथे बुधवारी (दि. २५ सप्टेंबर) हॉटेल डेमोक्रेसी येथे अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. लोकसभा निवडणुकीत महायुतीला उत्तर महाराष्ट्रातून ४७ टक्के मते मिळाली. विधानसभा निवडणुकीत हे प्रमाण ५१ टक्क्यांवर जाणं आवश्यक आहे, असे अमित शाह म्हणाले.

एकनाथ शिंदे सोशल मीडियावर ट्रोल

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी टीका करताच सोशल मीडियावरही अनेकांनी एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारला जाब विचारला आहे. इंडिया टुडे वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडीओ काहीजणांनी एक्सवर पोस्ट करत शिंदे यांना परखड प्रश्न विचारले आहेत.

हे ही वाचा >> महाराष्ट्रात यश मिळाल्यास देश जिंकल्याचा संदेश- अमित शहा

बुधवारी सायंकाळी आणि रात्री मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले. रेल्वे सेवा विस्कळीत झाली. तसेच रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. याचेही व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करून लोकांनी सरकारला प्रश्न विचारले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फिल्डवर उतरून काम करतात, असं म्हणाले. पण त्यांच्या दाव्याची दोन तासांतच पोल खोल झाली, अशी पोस्ट एका युजरनं केली आहे.