नाशिक – देशात आणि राज्यात लोकशाही, राज्यघटना थोक्यात आली असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात असंविधानिक सरकार सत्तेत आहे. राज्यात राजकारणाने अत्यंत खालची पातळी गाठली आहे. अशा स्थितीत संविधान वाचविण्यासाठी राज्यभर सभांच्या माध्यमातून प्रबोधन करणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी दिली.

श्याम मानव यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला. भारतीय लोकशाहीसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. लोकशाहीचे मूल्य जोपासण्यासाठी संविधानाचा जागर समाजातील सर्व घटकांमध्ये होणे आवश्यक आहे. परंतु, मागील काही दिवसांत भारतीय संविधानावरच हल्ला केला जात आहे. या पार्श्वभूमीवर, हिंदू राष्ट्र संकल्पना आणि भारतीय संविधान, भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने, या विषयांवर राज्यात सभा घेण्यात येत असल्याचे मानव यांनी सांगितले.. यवतमाळ, अमरावती, भंडारा, वाशिम, जळगाव, नंदुरबार यांसह इतर ठिकाणी सभा होणार आहेत. याअंतर्गत मंगळवारी सायंकाळी सहा वाजता नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिरात संविधान बचाओ – महाराष्ट्र बचाओ विषयावर मानव यांचे व्याख्यान होणार आहे. यामध्ये बिरसा मुंडा क्रांती दलाचे वक्ते दशरथ मडावी मार्गदर्शन करतील.

हेही वाचा >>>पैसे दामदुपटीच्या आमिषाने दोनशे कोटी रुपयांना फसवणूक, लासलगाव पोलिसांत गुन्हा

राजकारणाच्या खालावलेल्या पातळीविषयी प्रबोधन करण्यासाठी व्याख्यान घेत असल्याचे मानव यांनी सांगितले. आपल्याकडे ज्या पध्दतीने सरकार आले, त्यामुळे लोकशाही धोक्यात आहे. माझ्या घरात काँग्रेस आहे. आणीबाणीच्या काळात भाजपचे संघटन करीत होतो. इतक्या वर्षानंतर आता राजकारणात कसा येणार, असे मानव यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेस शिवसेनेचे (ठाकरे ) जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, डी. जी. सूर्यवंशी, काँग्रेसच्या हेमलता पाटील उपस्थित होते.

मविआलाही लाडकी बहीण योजना राबविणे भाग

लाडकी बहीण योजना म्हणजे, खरं तर पैशांची उधळपट्टी आहे. परंतु, महाविकास आघाडीलाही या योजनेला पाठिंबा द्यावाच लागेल अन्यथा ते स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतील. योजनेच्या माध्यमातून पुढील काळात पैसे वाढविण्यात येतील, असा दावा श्याम मानव यांनी केला.