नंदुरबार – लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटला असून फक्त चार जागांवरील जागावाटपाचा प्रश्न बाकी आहे. येत्या आठवड्यात तो प्रश्नही मार्गी लावून आठवडाभरात लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर केले जातील, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्च रोजी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. गांधी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा नंदुरबारमध्ये होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, सोमवारी बाळासाहेब थोरात, के. सी. पाडवी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सभास्थळ तसेच इतर ठिकाणांची पाहणी केली. यावेळी पत्रकारांनी विचारले असता बाळासाहेब थोरात यांनी, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर बैठका आणि चर्चा सुरु असल्याचे सांगितले.

हेही वाचा – भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना उमेदवारी हीच मोदींची गॅरंटी ; संजय राऊत यांची टीका

जे लोकशाहीवादी आहेत, भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती, विचारसरणी ज्यांना योग्य वाटत नाही, अशा सर्वांनी एकत्र यावे, असे आम्हाला वाटते. त्याच अनुषंगाने प्रकाश आंबेडकरांबरोबरदेखील बोलणी सुरु आहे, असे थोरात यांनी नमूद केले.

हेही वाचा – मंत्री दादा भुसे यांच्या विरोधातील धुसफूस बाहेर

कुठल्या मोठ्या नेत्याच्या जाण्याने काँग्रेस कधीच संपली नसून याआधीही देशात, महाराष्ट्रात काँग्रेसमधून अनेक बडे नेते बाहेर पडल्यानंतरही काँग्रेसने फिनिक्सप्रमाणे भरारी घेतल्याचे थोरात यांनी अशोक चव्हाण यांच्यासंदर्भात उपस्थित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. गांधी परिवार आणि नंदुरबार यांचे अतूट नाते असून इंदिरा गांधी निवडणूक प्रचाराची सुरुवात कायम नंदुरबारमधून करत असत, याची आठवणही थोरात यांनी करुन दिली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thorat comment mahavikas aghadi seat allocation the issue of seat allocation on only four seats remains balasaheb thorat reaction ssb
Show comments