मनमाड – येथील कॉम्रेड माधवराव गायकवाड बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने देण्यात येणाऱ्या कॉम्रेड माधवराव गायकवाड स्मृती जीवन गौरव पुरस्कारासाठी यंदा काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे.
संस्थेच्या अध्यक्षा ॲड. साधना गायकवाड आणि सचिव राजू देसले यांनी पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा केली. कॉम्रेड गायकवाड यांच्या विचारांचा वारसा व कार्य पुढे नेण्यासाठी त्यांच्या नावाने बहुउद्देशीय संस्था स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेतर्फे राज्यात सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक, सहकार, कामगार क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जातात. दरवर्षी त्यांच्या नावाने त्यांच्या स्मृतिदिनी जीवन गौरव पुरस्कार दिला जातो. या वर्षीच्या पुरस्कारासाठी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरचे माजीमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली. ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. संस्थेतर्फे या वर्षीपासून गायकवाड यांच्या पत्नी स्वातंत्र्यसैनिक कुसूमताई गायकवाड यांच्या नावानेही पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नवीन पिढीला त्यांची ओळख व्हावी म्हणून विविध उपक्रम जिल्ह्यांत वर्षभर राबविले जाणार आहेत. तसेच यावर्षी विविध व्याख्यानमाला आयोजित करून कॉ. गायकवाड यांच्या नावाचे संकेतस्थळ आणि ग्रंथ तयार करण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला.
हेही वाचा >>>नाशिक: किरीट सोमय्या यांच्या विरोधात ठाकरे गटाचे आंदोलन
हेही वाचा >>>नाशिक: मंत्रिपद मिळाल्याने निधीची चिंता मिटली ,येवल्यातील ३६ कोटींची कामे पुरवणी अर्थसंकल्पात सामील
दरम्यान, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, खंडकरी शेतकऱ्यांचे लढाऊ नेतृत्व माजी आमदार माधवराव गायकवाड यांचा ९९ वा वाढदिवस त्यांनी स्थापन केलेल्या छत्रपती नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावर्षी १०० वा वाढदिवस राज्यात विविध ठिकाणी त्यांच्या राजकीय, सामाजिक, शेतकरी, सहकार क्षेत्रांतील योगदानाबद्दल विविध विषयांवरील परिसंवाद आयोजित करून साजरा केला जाणार आहे. माधवराव गायकवाड यांची भारतीय कम्युनिस्ट पक्षावरील निष्ठा गौरवास्पद असून राज्यांतील विधान परिषदेचे ते पहिले विरोधी पक्षनेते होते. शतक महोत्सवनिमित्ताने शासनाने गायकवाड यांचे मनमाड येथे स्मारक उभारावे व पूर्णाकृती पुतळा बसवावा, अशी मागणी विविध वक्त्यांनी या कार्यक्रमात केली. येवला रस्त्यावरील बाल सुधारगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्य, वह्या पुस्तकांचे वाटप व अन्नदान करण्यात आले.