लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: जिल्ह्यातील केळी उत्पादक राज्य सरकारविरोधात आक्रमक झाले असून, उतिसंवर्धित रोपेनिर्मिती करणार्या कंपन्यांच्या प्रयोगशाळांसह रोपांची केंद्रीय कृषी मंत्रालयासह राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्या तज्ज्ञांकडून चौकशी करण्यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीतर्फे तीन ऑक्टोबरला रावेर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी निवेदन स्वीकारले.
रावेर येथील बाजार समितीच्या सभागृहात शेतकरी संघर्ष समितीची बैठक झाली. बैठकीत केळीची उतिसंवर्धित रोपे, ती निर्मिती करणार्या कंपन्यांच्या प्रयोगशाळा, केळीवर कुकुंबर मोझॅक व्हायरसचा (सीएमव्ही) होत असलेला प्रादुर्भाव, हवामानाधारित केळी फळ पीकविमा, सीएमव्ही बाधित क्षेत्राची रक्कम त्वरित शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा करावी यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. चर्चेत उद्योजक श्रीराम पाटील, रमेश पाटील, सचिन पाटील, योगेश पाटील, डॉ. राजेंद्र पाटील आदींनी भाग घेतला.
आणखी वाचा-जळगाव जिल्ह्यात विसर्जनावेळी तरुण बुडाला, शोध चालू
उद्योजक श्रीराम पाटील यांनी केळी रोपांची निर्मिती करणार्या कंपन्यांच्या प्रयोगशाळांची व निर्मिती झालेल्या रोपांची केंद्रीय कृषी मंत्रालय आणि राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्या तज्ज्ञांकडून चौकशी करण्यासह यात दोषी आढळणार्या कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, हवामानावर आधारित केळी फळ पीकविम्याची व कुकुंबर मोझॅक व्हायरसने बाधित झालेल्या क्षेत्राचे त्वरित पंचनामे करून रक्कम मिळावी, या मागण्यांसाठी आमदार एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात शेतकरी संघर्ष समितीतर्फे तीन ऑक्टोबरला रावेर येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.