नाशिक : भिवंडी वळण रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नाशिककडे येणारी ७० टक्के वाहने समृद्धी महामार्गावरून मार्गक्रमण करतील. त्यामुळे नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक कमी होईल. आगामी पावसाळ्याआधी भिवंडी वळण रस्ता बराचसा पूर्ण केला जाणार आहे. त्यामुळे मुंबईला ये-जा करताना नाशिककरांची दोन तास अडकून पडण्याच्या त्रासातून मुक्तता होईल, अशी आशा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी (२५ किलोमीटर) या तिसऱ्या टप्प्याचे उदघाटन राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते नांदगाव सदो येथील इगतपुरी पथकर प्लाझा येथे करण्यात आले.

हेही वाचा…मंत्री दादा भुसे यांच्या मुलाच्या उमेदवारीसाठी धडपड, भाजपमध्ये धाकधूक

यानिमित्ताने नाशिक हे इगतपुरीजवळ समृध्दी महामार्गाशी जोडले गेले. मुंबई-नाशिक महामार्गावरील प्रवास वाहतूक कोंडीमुळे जिकिरीचा ठरला आहे. अनेक मंत्री या मार्गाने प्रवास करण्याऐवजी रेल्वेने नाशिकला ये-जा करतात. समृद्धी महामार्गाचा पुढील टप्पा आणि भिवंडी वळण रस्त्याचे काम झाल्यानंतर नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहनांची संख्या ७० टक्क्यांनी कमी होऊन वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल, याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले.

मुंबई-नाशिक महामार्ग तयार करताना आठ वर्षांनी त्याची लांबी वाढवण्याचे ठरले होते. दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून काही अंतर रस्ता काँक्रिटचा केला जात असून उर्वरित रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नाशिक समृध्दी महामार्गाशी जोडले गेल्याने शेतमालाची वाहतूक करण्यासाठी ते फायदेशीर ठरणार आहे. या मार्गावर वाहने चालवताना नियमांचे पालन करणे आवश्यक असून त्यासाठी एक-दोन दिवसांचे खास प्रशिक्षण देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मुंबई ते नागपूर या मुख्य शहरांबरोबरच १५ जिल्ह्यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे वेळेची मोठी बचत होणार असल्याचे नमूद केले.

हेही वाचा…नाशिक : आठव्या दिवशी शेतकरी आंदोलन स्थगित, तीन महिन्यात मागण्यांची पूर्ती करण्याचे आश्वासन

पर्यटन, तीर्थस्थळे जोडली जाणार

समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून पर्यटन आणि तीर्थस्थळे जोडली जाणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. महामार्गावर अपघात, दुर्घटना टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. महामार्गावर उभारण्यात आलेला टोलनाका तसेच इतर १८ ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये स्थानिकांना रोजगाराच्या दृष्टीने प्राधान्य राहणार आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने स्थानिक शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhiwandi turn road to divert majority of traffic to samruddhi mahamarg easing congestion on nashik mumbai highway psg
Show comments