नाशिक – आषाढी एकादशीच्या निमित्ताने नाशिक सायकलिस्टस् फाऊंडेशनच्यावतीने पाच ते सात जुलै या कालावधीत नाशिक ते पंढरपूर या ३५० किलोमीटर सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा वारीत ३०० सायकलपटू सहभागी होत आहेत. संपूर्ण राज्यातील सायकलपटू सात जुलै रोजी पंढरपूरमध्ये एकत्र येतील. त्यांचा सायकल रिंगण सोहळा होणार आहे.

फाऊंडेशनचे संस्थापक निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी हरीश बैजल यांनी मातोश्री लज्जावती बैजल यांच्या स्मरणार्थ पंढरपूर सायकल वारी सुरू केली. यंदाचे सायकल वारीचे १२ वे वर्ष आहे. वारकरी संप्रदाय पुन:श्च रुजावा, युवा पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढावे, या हेतूने वारीतून जनजागृती केली जाणार आहे. प्रवासादरम्यान फाऊंडेशनचे पथक मार्गातील गावोगावी पथनाट्याद्वारे प्रबोधन करतील. पांडुरंगाच्या चरणी व्यसनमुक्त भारत घडावा, हे साकडे घातले जाईल. वारीत डॉक्टर, उद्योजक ,शिक्षक, पोलीस अधिकारी सहभागी होत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. मूळ शहादा येथील व सध्या अमेरिकेत स्थायिक असलेले ४६ वर्षीय डॉ. दीपक चौधरी परदेशातून पंढरपूर सायकलवारीत सहभागी होण्यासाठी येत आहेत.

हेही वाचा >>> अमृतधाम परिसर विजेच्या लपंडावामुळे त्रस्त – रोजच्या त्रासामुळे नागरिकांमध्ये रोष

सायकल वारीत भक्तिमय वातावरण तयार व्हावे, यासाठी खुल्या वाहनात रथ तयार केला जाईल. रथात भव्यदिव्य विठ्ठल मूर्ती असणार आहे. सायकलपटूंबरोबर रुग्णवाहिका, वैद्यकीय पथकही असेल. वारीचे नियोजन अध्यक्ष किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, वारी प्रमुख उपाध्यक्ष अरुण पवार, डॉ. मनिषा रौंदळ, सचिव संजय पवार, संचालक दीपक भोसले हे करीत आहेत.

हेही वाचा >>> कांदा खरेदीची ईडी, सीबीआयतर्फे चौकशी गरजेची – उत्पादक संघटनेचे केंद्रीय समितीला पत्र

सायकल वारीचे वेळापत्रक

पाच जुलै रोजी सकाळी सहा वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे विठ्ठल आरती व हिरवा झेंडा दाखवून वारीला सुरुवात होईल. सायकलवारी नाशिकरोड-सिन्नर- नांदूर शिंगोटे-नान्नज-लोणी-राहुरीमार्गे अहमदनगर येथे १६० किलोमीटर अंतर पार करून सायकलपटू पोहोचतील. दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता सायकलवारी मिरजगाव- करमाळा-टेंभुर्णीमार्गे पंढरपूर येथे सायंकाळी भक्त निवास येथे पोहोचेल. तिसऱ्या दिवशी सात जुलै रोजी पंढरपूर येथे प्रभात फेरी काढून नगर प्रदक्षिणा आणि सायकल रिंगणचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील ३४ सायकल क्लब या दिवशी एकाचवेळी पंढरपूरमध्ये एकत्र येतील. महाराष्ट्रातील सर्व सायकलपटूंना एकाच व्यासपीठावर एकत्रित आणण्यासाठी नाशिक सायकलिस्ट्सचे माजी अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, चंद्रकांत नाईक, व रवींद्र दुसाने यांनी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमात आतापर्यंत १८०० सायकलपटूंनी नोंदणी केलेली आहे. परभणी, सोलापूर, बारामती, कोल्हापूर, इचलकरंजी, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, लातूर आदी ठिकाणाहून सायकलपटूू रिंगण सोहळ्यासाठी व संमेलनासाठी जमणार आहेत. पांडुरंगाच्या दर्शनानंतर नाशिकच्या सायकलपटूंचा परतीचा प्रवास गाडीने होईल.