लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : आठवडाभरापासून जिल्ह्यात उष्णतेची लाट असताना दुसरीकडे धरणांतील जलसाठा वेगाने कमी होत आहे. जिल्ह्यातील धरणसाठा २३.८९ टक्क्यांवर आला. दोन धरणे आधीच कोरडीठाक झाली असून अन्य चार धरणे तळ गाठण्याच्या मार्गावर आहेत. अन्य सहा धरणांमध्ये २० टक्क्यांहून कमी जलसाठा आहे.

नाशिकच्या तापमानाने ४० अंशाचा टप्पा ओलांडल्यामुळे तीव्र ऊन आणि प्रचंड उकाड्याला तोंड द्यावे लागत आहे. पाण्याची मागणी वाढत असताना उपलब्ध जलसाठे वेगाने कमी होत आहेत. बाष्पीभवनाची त्यास झळ बसत आहे. नागासाक्या आणि पुणेगाव धरण आधीच कोरडेठाक झाले असताना लवकरच ओझरखेड (एक टक्का जलसाठा), भोजापूर (तीन टक्के), वाघाड आणि माणिकपुंज (प्रत्येकी पाच टक्के) या चार नव्या धरणांचा समावेश होण्याच्या मार्गावर आहे.

आणखी वाचा-नाशिक जिल्ह्यात पाच लाख नागरिकांची टँकरवर भिस्त, लोकसभेच्या प्रचाराचा धुरळा अन प्रत्यक्षातील स्थितीत अंतर

या व्यतिरिक्त भावली (१२), कडवा (१६), केळझर (१६), चणकापूर (१९), करंजवण (१५), आळंदी (१७) या धरणांमध्ये अल्प जलसाठा आहे. पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील २४ पैकी २२ धरणांमध्ये सध्या पाणी आहे. त्यातील चार धरणांमध्ये एक ते पाच टक्क्यांच्या दरम्यान जलसाठा असून ते कुठल्याही क्षणी कोरडेठाक होतील. पालखेड धरणात २२० दशलक्ष घनफूट (३३ टक्के), दारणा १६६८ (२३), मुकणे २०७३ (२८), वालदेवी ४५० (३९), नांदूरमध्यमेश्वर ६९ (२६), हरणबारी ४३५ (३७), गिरणा ४१९१ (२२), पुनद ८९१ (६८ टक्के) जलसाठा आहे. एप्रिलच्या उत्तरार्धात धरणांमध्ये १५ हजार ५८५ दशलक्ष घनफूट इतका जलसाठा आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण २६ हजार ९१७ दशलक्ष घनफूट इतके होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास १७ टक्के कमी जलसाठा आहे.

आणखी वाचा-उमेदवारीचा ताण दूर झाल्याने आयपीएल सामने पाहण्यात भुजबळ रममाण…

गंगापूर ४१ टक्के

नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २३४४ दशलक्ष घनफूट म्हणजे ४१ टक्के जलसाठा आहे. या धरण समुहातील काश्यपीत ६१५ (३३), गौतमी गोदावरी ५३१ (२८) आणि आळंदीत १४५ (१७ टक्के) जलसाठा आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dam stock at 23 per cent four new dams nearing completion mrj
Show comments