नाशिक – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने महिनाभर राबविलेल्या सामाजिक न्याय पर्व उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नऊ हजारहून अधिक विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यात ३६६२ विद्यार्थ्यांना वैधता तर ५६९७ जात प्रमाणपत्रांचा समावेश आहे.
विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आणि बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या निर्देशानुसार जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने ही मोहीम राबविली. इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून ३६६२ विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन निर्गमित करण्यात आले. जिल्ह्यातून सर्व उपविभागीय अधिकारी यांच्याकडून ५६९७ जात दाखले निर्गमित करण्यात आले आहेत.
ज्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फॉर्मसी, विधी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमास आरक्षित जागेवर प्रवेश घ्यावयाचा आहे आणि ज्यांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज ऑनलाईन भरलेले नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन अर्ज बार्टी व्हॅलिडिटी डाॅट महाराष्ट्रा डाॅट जीओव्ही डाॅट इन या संकेतस्थळावर सर्व मूळ कागदपत्र अपलोड करून आणि ते अर्ज अपलोड केलेल्या मूळ कागदपत्रांच्या सत्यप्रतीसह आणि मूळ शपथपत्रांसह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिकच्या नागरी सुविधा केंद्रात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत स्वतः किंवा कुटुंबियांमार्फत जमा करावेत. जेणेकरून त्यांच्या प्रकरणांवर समितीस वेळेत निर्णय घेता येतील.
हेही वाचा – “शिंदे सरकार अजूनही टांगणीवरच…”, विधानसभा उपसभापती नरहरी झिरवळ यांची प्रतिक्रिया
दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन
अर्जदारानी अर्ज भरतांना स्वतःचा इ मेल आणि भ्रमणध्वनी क्रमांकाद्वारेच अर्ज नोंदणी करावा. सर्व मूळ कागदपत्र अपलोड करावी व आपला वापर सांकेतांक (युझर आयडी) तसेच सांकेतांक (पासवर्ड) व्यवस्थित जतन करून ठेवावा. समितीने त्या प्रकरणावर निर्णय घेतल्यानंतर निर्णय, जात वैधता प्रमाणपत्र हे त्यांनी नोंदणी केलेल्या इ मेलवर प्राप्त होत असते. त्यामुळे कोणत्याही अर्जदाराने त्रयस्थ व्यक्तीकडे संपर्क करू नये. त्रयस्थ व्यक्तींच्या अमिशास बळी पडू नये. अशा त्रयस्त व्यक्तीकडून नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे अर्जदारांनी आपले अर्ज स्वतः व्यवस्थितरित्या परिपूर्ण सादर करावे. अन्य कार्यालयाबाहेरील व्यक्तीशी संपर्क करू नये, असेही आवाहन समितीने केले आहे.