नाशिक : दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने खाद्यपदार्थ विक्रेत्यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून कुठल्याही पदार्थात भेसळ आढळल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

दिवाळीत मिठाईसह तयार फराळाला प्रचंड मागणी असते. हे लक्षात घेऊन काही दुकानदारांकडून मिठाईत भेसळीचा मार्ग अवलंबिला जातो. विशेषत: दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळीची शक्यता अधिक असते. चिवडा किंवा इतर फराळाच्या पदार्थांमध्ये बनावट तिखटाचाही वापर करण्यात येतो. हे लक्षात घेऊन नागरिकांना दर्जेदार, सकस मिठाई मिळावी, अन्न पदार्थांमधील भेसळ रोखली जावी, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने आवश्यक पाऊले उचलण्यास सुरूवात झाली आहे.

हेही वाचा…शिवसेनेच्या संभाव्य उमेदवाराच्या मुलावर मोक्कातंर्गत कारवाई

संबंधित विभागाची पथके शहरातील मिठाई विक्रेते, खवा, मावा विक्रेते, उत्पादकांवर लक्ष ठेवणार आहेत. नुकतीच व्यावसायिक आणि मिठाई उत्पादकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पदार्थ तयार करताना अन्न व औषध प्रशासन विभागाचे कोणते नियम पाळावेत, त्यासाठी आवश्यक सूचना करण्यात आल्या. . ग्राहकांनी अधिक माहितीसाठी तसेच तक्रारीसाठी १८००२२२३६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.