लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : नवरात्रोत्सवानिमित्त साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कळवण तालुक्यातील सप्तश्रृंग गड येथे देवीच्या दर्शनासाठी पहिल्या दिवसापासून भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने भाविकांसाठी जादा ३०० बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे.

सप्तश्रृंग गड येथे होणाऱ्या उत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी गुरूवारपासून ते १२ ऑक्टोबर आणि कोजागिरी पौर्णिमा उत्सवासाठी राज्य परिवहनकडून ३०० जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी शहरातील ठक्कर बजार बस स्थानकात व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक-दिंडोरी-वणीमार्गे नांदुरी आणि नांदुरी ते सप्तश्रृंग गड याशिवाय मालेगांव आणि मनमाड, सटाणा येथून जादा बससेवा सुरु करण्यात आली आहे. इगतपुरी ते घाटनदेवी अशीही बससेवा सुरू करण्यात आली आहे.

आणखी वाचा-नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

याव्यतिरिक्त नाशिक-सप्तश्रृंगी गड मार्गावर इलेक्ट्रिक बसच्या ३० फेऱ्या करण्यात येणार आहेत. या बससेवेचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.