नाशिक – जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर आठ दिवसांपासून विविध मागण्यांसाठी चालू असलेले शेतकरी, शेतमजुरांचे आंदोलन सोमवारी सायंकाळी मागे घेण्यात आले. पालकमंत्री दादा भुसे यांची शिष्टाई अखेर यशस्वी ठरली. पुढील तीन महिन्यात आंदोलन कर्त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. आंदोलन स्थगित झाल्याने शहराचा मध्यवर्ती रस्ता लवकरच वाहतुकीला खुला होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालकमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक झाली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी वन जमिनी, शासकीय दाखले, शासकीय योजनांचा लाभ यांसह इतर प्रलंबित मागण्यांविषयी चर्चा करण्यात आली. आंदोलकांचे नेते माकपचे माजी आमदार जे. पी. गावित आणि सहकारी हे मागण्यांवर ठाम होते. भुसे यांनी, शासन स्तरावर आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर काय काम होत आहे, याविषयी माहिती दिली. बहुसंख्य मागण्यांवर काम चालू आहे. पुढील तीन महिन्यात आंदोलनकर्त्यांनी केलेल्या सर्व मागण्यांवर सकारात्मक काम होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. काही मागण्यांविषयी जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागवण्यात आले आहे. त्याबाबत दोन ते तीन दिवसात मार्गदर्शन मिळाल्यानंतर अंमलबजावणीस सुरूवात होईल. प्रलंबित दाव्यांसह अन्य मागण्यांबाबत शासनस्तरावर कायदे, नियम यानुसार अंमलबजावणी होईल. प्रलंबित दाव्यांची छाननी सुरू असून त्याविषयी प्रमाणपत्र तयार करण्यात येत आहे. काही ठिकाणी सातबाऱ्यांवरील नोंदीत खाडाखोड झाल्याने पोटखराबा उतारा झाला आहे. याबाबत तहसीलदारांना सूचना करण्यात आली असून त्या त्या जागेवर जाऊन छाननी करत पंचनामे करण्यास तसेच त्यानुसार वैधजमिनीची नोंद सातबाऱ्यावर करण्यास सांगण्यात आले आहे. शबरी योजनेअंतर्गत घरकुल, कांदा दर याविषयी चर्चा करण्यात आली. पुढील तीन महिन्यात काम होईल, असे आश्वासन भुसे यांनी दिले.

हेही वाचा – सरकार ठरविण्याची ताकद शेतकऱ्यांनी निर्माण करावी, शेतकरी साहित्य संमेलनात नाना पाटेकर यांचे प्रतिपादन

हेही वाचा – एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्यास…. अ‍ॅड. रोहिणी खडसेंचा आरोप

याबाबत आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. सायंकाळी संप स्थगित झाला असला तरी आंदोलनकर्त्यांंना शिष्टमंडळाशी झालेल्या बैठकीची माहिती देण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. आंदोलकांची भाषणे सुरू असल्याने संप स्थगित झाला की सुरू, असा संभ्रम लोकांच्या मनात कायम राहिला. दरम्यान, दुपारी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची लोकसभा मतदारसंघ संघटक विजय करंजकर, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी भेट घेत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers agitation suspended on eighth day promise to fulfill the demands in three months ssb