त्र्यंबक येथील साधुग्राम परिसरात शिवानी दुर्गा सिंह यांच्यावतीने १५ सप्टेंबर रोजी हिंदू धर्म जनजागरण या विषयावर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनात हिंदू धर्म प्रचार आणि प्रसाराच्या दृष्टीने सर्व आखाडय़ांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चा होणार आहे.
काही दिवसांपूर्वी देशातील जनगणनेची धर्मनिहाय आकडेवारी जाहीर झाली. त्यात हिंदू धर्मीयांची संख्या काही अंशी कमी झाल्याचे लक्षात येत आहे. गेल्या काही वर्षांत धर्मातरामुळे मोठय़ा प्रमाणावर काही घटक हिंदू धर्मापासून दूर चालले आहे तर दुसरीकडे काहींना आमिष दाखवून अन्य धर्मात धर्मातरित करण्यात येत असल्याचे हिंदू संघटनांनी म्हटले आहे. या पाश्र्वभूमीवर, सर्व हिंदूंनी एकत्र येत हिंदू रक्षणासाठी एल्गार पुकारणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने सर्वेश्वरी आश्रमच्यावतीने हिंदूंचे संघटन व्हावे तसेच हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी हिंदू धर्म जनजागरण या विषयावर पेगलवाडी येथील प्लॉट नं. ४ येथे संमेलन भरविण्यात येणार आहे. संमेलनात हिंदू धर्मातील स्थित्यंतरे, सद्य:स्थिती, याविषयी काय करू शकतो आदी विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती शिवानी दुर्गा यांनी दिली. संमेलनात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज, आनंद आखाडय़ाचे सागरानंद सरस्वती, बिंदू महाराज यांच्यासह विविध आखाडय़ाच्या साधू-महंतांना आमंत्रित करण्यात आले आहे.